मुंबई बातम्या

दक्षिण मुंबईतून महालक्ष्मी रेसकोर्स हलविण्याच्या हालचाली; मुंबई महानगरपालिकेने शोधला ‘हा’ पर्याय – Maharashtra Times

मुंबईः दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेकरार १० वर्षांपूर्वी संपुष्टात आला असून आता या भूखंडावर थीमपार्क उभारण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईतच दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे.

महालक्ष्मीऐवजी रेसकोर्स आता मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याचा प्रस्ताव आहे. मुलुंडचा डम्पिंग ग्राऊंडचा परिसर साधारणपणे २४ हेक्टर इतका आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचा करार काही वर्षांपूर्वीच संपला आहे. त्यामुळं या जागेचा ताबा पुन्हा महानगरपालिकेकडे घेण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहणार आहे. तर, रॉयल वेस्ट इंडिया टर्फला त्या बदल्यात दुसरी जागा देण्यात येणार आहे.

मुलुंडचं डंम्पिंग ग्राउंड आणि त्याच्या शेजारील खासगी मालकीची जागा रेसकोर्स आणि इतर सुविधांना सामावून घेण्यासाठी पुरेशी आहे. तसंच, खासगी जमीन संपादित करण्यासाठी बीएमसीला मोठी किंमत मोजावी लागेल कारण ती जागा सध्याच्या बाजारभावानुसार विकत घ्यावी लागेल, असं राज्य सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

वाचाः गृहखरेदी आता बिनधोक! महारेराकडे नोंदणीवेळी प्रवर्तकांनी ‘हे’ काम करणे बंधनकारक

महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड येथे स्थलांतरित करण्यासाठी बीएमसीला खासगी जमीन संपादित करावी लागेल नंतर ती मुलुंड डम्पिंग ग्राऊंडशी जोडावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. खाजगी जमीन खरेदी करून ती रेसकोर्ससाठी सुपूर्द करणे शक्य होणार नाही. रेसकोर्स चालवणे हा सार्वजनिक उद्देश नसल्यामुळे, खाजगी जमीन खरेदी करण्यासाठी सार्वजनिक पैसा खर्च करण्यास विरोध होऊ शकतो, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

BMC चे प्रमुख इक्बाल सिंग चहल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुलुंड डम्पिंग ग्राऊंडचा पर्याय अजूनही विचारधीन असून त्याबाबत चर्चा सुरू आहे

वाचाः रस्त्यांना तडे, भिंतीना भेगा संपूर्ण शहरच खचतंय…; उत्तराखंडमधील जोशीमठावर मोठं संकट

काय आहे प्रकरण?

रेसकोर्सचा ताबा असलेल्या मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचा महापालिकेशी झालेला करार सन २०१३मध्ये संपुष्टात आला. त्यामुळे हा भूखंड पुन्हा टर्फ क्लबला देऊ नये, तसेच या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क पालिकेने उभारावे, असा प्रस्ताव शिवसेनेने महापालिकेत मांडला होता. मात्र त्यावर तत्कालिन राज्य राज्यसरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र भाडेकरार संपून दहा वर्षे झाल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

वाचाः माझ्या प्रायव्हेट पार्टला कोणीतरी…; ऑपरेशन थेटरमध्ये महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiowFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2JtYy1wcm9wb3Nlcy10by1zaGlmdC1tYWhhbGF4bWktcmFjZWNvdXJzZS1mcm9tLXNvdXRoLW11bWJhaS10by1tdWx1bmQtZHVtcGluZy1ncm91bmQvYXJ0aWNsZXNob3cvOTY4MDc4MDEuY21z0gGnAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3MvYm1jLXByb3Bvc2VzLXRvLXNoaWZ0LW1haGFsYXhtaS1yYWNlY291cnNlLWZyb20tc291dGgtbXVtYmFpLXRvLW11bHVuZC1kdW1waW5nLWdyb3VuZC9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTY4MDc4MDEuY21z?oc=5