मुंबई बातम्या

मुंबईत पावसाला सुरुवात होताच दरड कोसळण्याची टांगती तलवार; रहिवासी भयभीत – Maharashtra Times

चेंबूर दगड दुर्घटनेमुळे दरडींखालील रहिवाशांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

-दरड कोसळण्याची टांगती तलवार

– रहिवासी भयभीत

-कायमस्वरूपी घरांची मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: बरोबर एक वर्षांपूर्वी १८ जून, २०२१च्या मध्यरात्री बेफाम पावसात चेंबूर, विक्रोळी, भांडुप, चांदिवलीत एकापाठोपाठ दरड कोसळण्याच्या चार दुर्घटना घडून तब्बल ३० जणांचा मृत्यू झाला. या काळरात्रीची दहशत अद्याप रहिवाशांच्या मनात दाटलेली असतानाच १९ जून, २०२२च्या पहाटे चेंबूर वाशीनाका येथे डोंगरातून घरंगळत एक भलामोठा दगड प्रजापती कुटुंबियांच्या थेट घरात शिरला आणि रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. या दुर्घटनेत प्रजापती कुटुंबातील दोन जण जखमी झाले आहेत. पावसाळा सुरू झाला असल्याने दरडींखाली राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावर दरड कोसळण्याच्या घटनांची टांगती तलवार आहे. यावर या रहिवाशांचे कायमस्वरूपी सुरक्षित पुनर्वसन हाच पर्याय आहे.

गेल्या वर्षीच्या पावसात चार ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० हून अधिक कुटुंबियांचे संसार मातीमोल झाले. चेंबूर वाशीनाका, भारतनगर, बंजारा तांडा वस्ती येथील दुर्घटनेत १९, विक्रोळी सूर्यनगरमध्ये दहा, भांडुपला एक असे एकूण ३० जणांचे बळी गेले तर दहा जण जखमी झाले होते. वर्षभरानंतरही या कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले गेले नसताना रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास चेंबूर वाशीनाका येथील भीमटेकडी, सिद्धार्थ नगर बुद्ध विहाराजवळ डोंगरातून संरक्षक भिंत फोडून एक मोठा दगड कोसळला व प्रजापती कुटुंबियांच्या दरवाजातून घरात घुसला. घरात आई-वडिल आणि दोन मुले होती. त्यापैकी अरविंद अशोक प्रजापती (२५) आणि आशीष अशोक प्रजापती (२०) हे दोघे भाऊ जखमी झाले आहेत. त्यांच्या हातापायाला व डोक्याला मार लागला असून सायन रुग्णालयात उपचार करण्यात आले. आशीषवर उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. या दुर्घटनेत या कुटुंबियांच्या घरातील काही फर्निचर व इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

गेल्या वर्षी याच भागातील बंजारा तांडा वस्ती येथे घरांवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती. त्या वस्तीपासून पाच मिनिटांच्या अंतरावरच भीमटेकडी आहे. डोंगराला खेटून येथे झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. परिसरात सुमारे एकूण पाच हजार झोपड्या आहेत. तर दरडींचा धोका असलेल्या सुमारे दोन ते अडीच हजार झोपड्या आहेत, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश खंडांगळे यांनी दिली. कोसळलेला दगड खूप वजनदार असल्याने पालिकेच्या पथकाने रविवारी सकाळी हा दगड मशीनने फोडून त्याचे तुकडे करून तेथून हलवला, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली.

‘ते’ १९ कुटुंबीय अद्याप संक्रमण शिबिरात

गेल्या वर्षी बंजारा तांडा वस्ती येथील दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेल्या १९ कुटुंबियांसह सुमारे २५ कुटुंबांना वाशीनाका एस. जी. केमिकल्स परिसरात पालिकेच्या संक्रमण शिबिरात हलवण्यात आले. वर्षभरानंतरही हे कुटुंबीय अद्याप तिथेच वास्तव करत आहेत. या दुर्घटनेत या सर्व कुटुंबीयांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घरांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. दरडींखाली राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका निधी शिंदे यांनी केली आहे. रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने धोरण ठरवण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-civic-body-asks-residents-living-in-landslide-prone-areas-to-relocate/articleshow/92325648.cms