मुंबई बातम्या

तिकिटाअभावी प्रवाशांकडून नियमभंग – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : लसधारकांना मुंबई लोकलचे तिकीट न देण्याचा नियम राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला घालून दिला आहे. लोकलचे तिकीट मिळत नसल्याने अनेकांना नियमभंग करत विनातिकीट प्रवास करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यांत पश्चिम रेल्वेने ४.७९ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून २४ कोटींचा दंड वसूल केला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे अर्थात मुंबई लोकल सुरू झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच अधिकृतपणे तिकीट मिळत आहे. लसधारकांना लोकल प्रवासाची मुभा आहे. मात्र त्यांना केवळ मासिक पास मिळत आहे. आठवडा किंवा पंधरवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रवास करण्यासाठी एक महिन्याचा मासिक पास घेणे अनेकांना परवडत नाही. यामुळे विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत विनातिकीट रेल्वे प्रवास या गुन्ह्याखाली ४.७९ लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यापैकी अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या ५६५ इतकी आहे. ही संख्या वगळता अन्य सर्व नोकरदार प्रवासी असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दोषी प्रवाशांकडून २४.६० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तिकीट द्यायला अडचण काय?

सहा महिन्यांत पावणेपाच लाख प्रवासी विनातिकीट सापडले आहे. लसधारकांना पास मिळतो, मग तिकीट देण्यास अडचण काय, याचे उत्तर नियमावली तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना देता आलेले नाही. राज्य सरकारने आता नियमावलीत बदल करणे आवश्यक असून लसधारकांना लोकलचे तिकीट देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांची आहे.

मास्कविना प्रवाशांनाही बडगा

१७ एप्रिल ते ३० सप्टेंबर या दरम्यान पश्चिम रेल्वेवर मास्कविना प्रवास करताना आढळलेल्या आठ हजार ९१४ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रवाशांकडून १७ लाख ४८ हजार ४४५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/western-railway-collects-rs-4-79-lakh-in-fines-over-past-6-months/articleshow/86982132.cms