आबुधाबी : कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर ८६ धावांनी मोठा विजय साकारला आणि मुंबई इंडियन्ससाठी प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आता कठीण झाला आहे. पण मुंबई इंडियन्सने जर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात २०० धावा केल्या तर ते प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतात का, याबाबतचे समीकरण आता समोर आले आहे.
मुंबई इंडियन्ससाठी काय आहे प्ले-ऑफचे समीकरण, जाणून घ्या…
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आता मुंबई इंडियन्सला प्रथम गोलंदाजी करून जास्त फायदा होणार नाही. कारण मुंबई इंडियन्सच्या संघाला प्ले-ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांच्यापुढे आता मोठे समीकरण तयार झाले आहे. मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता प्रथम फलंदाजी करणेच हितकारक ठरणार आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना जर २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या तरच त्यांचे आव्हान टिकाव धरू शकते, असे दिसत आहे. जर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याच मुंबई इंडियन्सने २०० धावा केल्या, तर तेवढ्यावर थांबून त्यांना चालणार नाही. कारण त्यानंतर त्यांना हैदराबादच्या संघाला झटपट बादही करावे लागेल. जर मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात २०० धावा केल्या तर त्यांना १७० धावांनी मोठा विजय साकारावा लागेत. याचाच अर्थ असा आहे की, मुबंईने जर २०० धावा केल्या तर त्यांना हैदराबादच्या संघाला ३० धावांमध्ये ऑलआऊट करावे लागेल. त्यामुळे मुंबई इंडियन्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात जशी जशी २०० धावांच्या पुढे जात राहील तशी त्यांची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी वाढत जाईल. पण जर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाला १७० धावा करता आल्या नाहीत तर तिथेच त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १०पेक्षा जास्त धावगतीने रन्स जमवावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांना एक नवा विक्रम फलंदाजी बनवावा लागेल, तेव्हाच त्यांचे प्ले-ऑफचे आव्हान जीवंत राहू शकते. त्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ आता संघात नेमका काय बदल करतो आणि कोणती खास रणनिती आखली जाते, हे सर्वात महत्वाचे असेल.
Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/if-mumbai-indians-scored-200-runs-in-match-against-sunrisers-hyderabad-then-they-can-qualify-for-play-offs-know-the-calculations/articleshow/86849054.cms