मुंबई बातम्या

निवडणुका लांबणीवर – Maharashtra Times

करोनामुळे नवी मुंबई, बदलापूर, अंबरनाथची निवडणूक लांबणीवर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी नवे निर्बंध उपाय लागू केले. यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे नवी मुंबई महापालिकेसह कुळगाव-बदलापूर तसेच अंबरनाथ नगर परिषद निवडणुकांची तारीख लांबणीवर पडणार आहे. निवडणुकांसोबतच शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांतील शाळा-कॉलेजेही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

करोना नियंत्रणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी प्रतिबंधात्मक नवे निर्णय जाहीर केले. ‘राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यासंदर्भात आयोग लवकरच निर्णय घेईल. ग्रामीण भागातील धार्मिक यात्रा, जत्रा, उत्सव, राजकीय सभांवर निर्बंध घालण्यात आले असून, लोकांनी सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी’, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. ‘परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी विमानतळाच्या आजुबाजूच्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तूर्तास काही निवडक हॉटेलांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली असून, त्याची बिले राज्य सरकार देईल’, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. आज, मंगळवारपासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असून, इतर शासकीय कार्यालयात गर्दी न करता नागरिकांनी ई-मेलद्वारे तक्रारी, अर्ज पाठवावेत व त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांत कार्यवाही करावी, असे आदेशही त्यांनी दिले. कोरोनाविरोधातील उपाययोजनांसाठी कोकण, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना एकूण ४५ कोटी रु.चा निधी देण्याचा निर्णयही ठाकरे यांनी जाहीर केला.

राज्यातील प्रमुख देवस्थाने बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रार्थनास्थळांतील भाविकांची गर्दी तत्काळ थांबवावी, असे निर्देश दिल्यानंतर राज्यभरातील काही प्रमुख देवस्थानांमध्ये सोमवारी रात्रीपासूनच दर्शन बंद करण्यात आले, तर काही प्रार्थनास्थळे आज, मंगळपासून बंद राहणार आहेत. मुंबईतील सिद्धविनायक मंदिर सोमवारी रात्रीपासून बंद करण्यात आले. बीडमधील परळी वैजनाथ मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. लोणावळ्यातील कार्ला गडावरील एकविरा देवीची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर आजपासून बंद राहील. शेगाव येथील गजानन महाराज देवस्थानही ३१ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद राहील. नाशिकमधील सप्तशृंगीदेवी मंदिरातील दर्शनही बंद राहणार आहे. सांगलीतील नरसोबाची वाडी येथील दत्त मंदिरही अनिश्चित काळापर्यंत बंद राहील.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/the-election-is-on-hold/articleshow/74660913.cms