मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपमधील मनोज जोशी (वय – ३४) आणि मानसी जोशी (वय – ३४) हे दाम्पत्य साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आज सकाळी शिर्डीकडे निघाले होते. मात्र येवई नाका येथे पोहोचल्यानंतर जोशी दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. यावेळी दोघांच्याही डोक्यावरून कंटेनरचे चाक गेले. त्यामुळे मनोज आणि मानसी यांनी जागीच प्राण सोडले.
एकीकडे आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला असताना या भीषण अपघातातून ३ वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली आहे.
सुरक्षिततेची काळजी घेतली, मात्र तरीही घात झालाच!
खरंतर रस्त्यावरून प्रवास करताना अनेकजण निष्काळजीपणाने हेल्मेटचा वापर करणं टाळतात. मात्र मनोज जोशी आणि मानसी जोशी या पती-पत्नीने सुरक्षिततेची काळजी घेत हेल्मेट घातलं होतं. परंतु दोघेही कंटेनरखाली चिरडले गेल्याने हेल्मेटचाही चक्काचूर झाला. त्यामुळे रस्ते प्रवासाचे नियम काटेकोरपणे पाळणाऱ्या या दाम्पत्याला मृत्यूला चकवा देण्यात अपयश आले.
दरम्यान, या अपघाताबाबत माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह भिवंडी शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवले. तसंच कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी भिवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMipgFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL3RoYW5lL2EtY291cGxlLWZyb20tbXVtYmFpLWRpZWQtaW4tYW4tYWNjaWRlbnQtYXQteWV3YWktbmFrYS13aGlsZS1nb2luZy1mb3Itc2hpcmRpLXNhaS1iYWJhLWRhcnNoYW4vYXJ0aWNsZXNob3cvOTY2Mjk5NjkuY21z0gGqAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvdGhhbmUvYS1jb3VwbGUtZnJvbS1tdW1iYWktZGllZC1pbi1hbi1hY2NpZGVudC1hdC15ZXdhaS1uYWthLXdoaWxlLWdvaW5nLWZvci1zaGlyZGktc2FpLWJhYmEtZGFyc2hhbi9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTY2Mjk5NjkuY21z?oc=5