मुंबई बातम्या

मुंबई, पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला; दोन हजार बोटी अद्यापही समुद्रात – Maharashtra Times

कुटुंबीयांना चिंता

म. टा. वृत्तसेवा, पालघर: प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पालघर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळपासून वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. जून-जुलैमधील मासेमारीबंदीचा कालावधी संपला असला, तरी समुद्रातील वादळे आणि तुफानी लाटांचे डोंगर अशी धोकादायक परिस्थिती अजूनही कायम आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील मच्छिमारांच्या १ ऑगस्टपासून समुद्रात गेलेल्या दोन हजार बोटी आहेत. त्यामुळे या मच्छिमारांच्या घरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पालघर जिल्ह्यात ७ ते ११ ऑगस्टदरम्यान ताशी ६५ किमी वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला होता. त्यानुसार, किनारपट्टीवर जोरदार पाऊस आणि वारे असे वातावरण सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिले. समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याने मच्छिमार संस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पालघरचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली. मात्र या इशाऱ्यानंतरही जिल्ह्यातील सुमारे दीड हजार बोटी आजही समुद्रात असल्याची माहिती समोर आली आहे. पालघर, वसई, डहाणू, तलासरी तालुक्यांतील या बोटी आहेत.

किनारपट्टीवरून मासेमारीसाठी समुद्रात सुमारे आठ ते दहा तास लांब अंतरावर जाऊन मासेमारी न करताच किनाऱ्यावर परतणे डिझेलच्या चढ्या दरांमुळे आणि कामगारांच्या पगारामुळे परवडत नसल्याने या धोकादायक परिस्थितीतही या बोटी समुद्रात ठाण मांडून उभ्या असल्याचे काही मच्छिमारांनी सांगितले. मोसमातील पहिल्याच फेरीसाठी कर्ज काढून मासेमारीला गेलेल्या बोटीला मासेच मिळाले नाहीत, तर मग पुढच्या फेरीसाठी डिझेल, बर्फ, कामगारांच्या पगारासाठी पैसे कुठून आणायचे, अशी चिंता मच्छिमार विलास पाटील यांनी व्यक्त केली.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/palghar/imd-predicts-extremely-heavy-rain-from-monday-in-mumbai-thane-palghar/articleshow/93441606.cms