मुंबई बातम्या

रवींद्र जडेजापाठोपाठ चेन्नईचा संघही आयपीएलमधून आऊट, मुंबई इंडियन्सने केला खेळ खल्लास – Maharashtra Times

मुंबई : हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे… हे मुंबई इंडियन्सच्या संघाने आजच्या सामन्यात करून दाखवलं. कारण यापूर्वीच मुंबईचा संघ स्पर्धेबाहेर गेला होता. पण आता त्यांनी चेन्नईचा बदला घेत त्यांना आयपीएलबाहेर काढण्याचे काम आज मुंबई इंडियन्सच्या संघाने करून दाखवले. मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी तिखट मारा करत चेन्नईच्या फलंदाजीतील हवाच काढली. कारण चेन्नईच्या सात फलंदाजांना त्यांनी दोन अंकी धावसंख्याच गाठू दिली नाही. धोनीने यावेळी नाबाद ३६ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच त्यांना मुंबईपुढे विजयासाठी ९८ धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठ करणाऱ्या मुंबईला चेन्नईने इशान किशन आणि रोहित शर्माच्या रुपात दोन धक्के दिले होते, पण त्यांना जास्त धावाच करता आल्या नसल्यामुळे चेन्नईला पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला. काही तासांपूर्वीच रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते, त्यानंतर चेन्नईचा संघही आयपीएलमधून आऊट झाल्याचे पाहायला मिळाले.

चेन्नईची धावसंख्या कमी असली तरी त्यांनी मुंबईच्या संघाला चांगलेच झुंजवले. चेन्नईने मुंबईला ९८ धावांचे आव्हान दिले असले तरी त्यांनी इशान किशनला पहिल्याच षटकात सहा धावांवर बाद केले. त्यानंतर रोहित शर्मालाही १४ धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर मुकेश चौधरीने एकाच षटकात दोन बळी मिळवत मुंबईची ४ बा ३३ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर तिलक वर्मा आणि ह्रतिक शोकिन यांनी मुंबईच्या संघाला सावरले.

चेन्नई सुपर किंग्सने यापूर्वी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर अखेरच्या चेंडूवर विजय साकारला होता. महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत मुंबईचा पराभव केला होता. पण या पराभवाचा बदला मुंबईच्या संघाने घेतल्याचे पाहायला मिळाले. मुंबईने यावेळी नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी घेतली आणि मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईला एकामागून एक धक्के दिले. या धक्क्यातून चेन्नईच्या संघाला सावरता आले नाही. चेन्नईचा अर्धा संघ यावेळी २९ धावांमध्येच तंबूत परतला होता. त्यानंतर धोनी मैदानात शेवटपर्यंत उभा राहीला. धोनीने यावेळी नाबाद ३६ धावा केल्यामुळे चेन्नईला ९७ धावा तरी करता आल्या. मुंबईकडून यावेळी वेगवान गोलंदाज डॅनिलय सॅम्सने पहिल्याच षटकात दोन बळी मिळवले होते आणि एकूण सामन्यात त्याने तीन फलंदाजांना माघारी धाडले. त्याचबरोबर कुमार कार्तिकेय आणि रिले मॅरेडिथ यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/chennai-super-kings-out-of-the-race-of-ipl-2022-after-mumbai-indians-beat-them-by-5-wickets/articleshow/91523725.cms