खालापूर तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायत हद्दीत असंख्य कारखाने आहेत. यामधील एक असणारी न्यू बाँम्बे कारखान्यातील राखेमुळे जांभिवलीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नागरिक या कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत असताना या कंपनीवर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती महेश पांचाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना २३ डिसेंबर रोजी निवेदन देत कारवाईची मागणी केली होती.
मात्र,दोन महिने उलटूनही कंपनीवर कारवाई न झाल्याने तृप्ती पांचाळ पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. या कंपनीवर कारवाई होण्यासाठी तृप्ती पांचाळ २८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाला समोर उपोषणास बसणार आहेत. त्यामुळे तृप्ती पांचाळ विरुध्द कंपनी व्यवस्थापन असा संघर्ष अधिकच पेटणार आहे.
न्यू बॉम्बे कंपनीमधून बाहेर पडणार्या राखेमुळे जांभिवली गावातील नागरिकांसह आजूबाजूच्या परिसराचे आरोग्य धोक्यात आल्याने या कंपनीवर कारवाई होण्यासाठी तहसीलदार व इतर प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, कंपनीवर कोणतीही कारवाई न झाल्याने २८फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. उपोषणादरम्यान माझ्या जीवितास कोणतीही इजा झाल्यास त्याला सर्वश्री प्रशासन जबाबदार राहील.
– तृप्ती महेश पांचाळ, ग्रामपंचायत सदस्या, जांभिवली
ग्रा.प.सदस्या तृप्ती पांचाळ यांच्या तक्रारीची माहिती तहसीलदार, वरिष्ठांना व प्रदूषण मंडळाला दिली आहे. त्यावर तहसीलदार, वरिष्ठ व प्रदूषण मंडळ निर्णय घेतील.
– बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, खालापूर
Source: https://www.mymahanagar.com/raigarh/gram-panchayat-member-trupti-panchal-going-on-hunger-strike-as-new-bombay-company-delaying-removal-of-ashes/405907/