मुंबई बातम्या

Mumbai Vaccination: ‘तोपर्यंत १८ वर्षांवरील मुंबईकरांचे लसीकरण सुरू होणार नाही’ – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाबाबत बीएमसीची भूमिका
  • पुरेसा लससाठा असल्याशिवाय लसीकरण सुरू करणार नाही
  • महापालिका आयुक्त चहल म्हणाले, उगाच लोकांना घराबाहेर बोलावणं चुकीचं

मुंबई: येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. त्यानंतर देशभर लसीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र उभारली जात आहेत. मात्र, हे सगळं सुरू असतानाच मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. जोपर्यंत राज्य सरकारकडून लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात नाही, तोपर्यंत मुंबईत लसीकरण सुरू होणार नाही, असं चहल यांनी म्हटलं आहे. (BMC on Covid Vaccination Covid vaccine for all above 18 yrs)

वाचा: ‘देशाच्या या मानहानीसाठी दिल्लीश्वर कोणाला जबाबदार धरणार आहेत?’

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या प्रतिनिधीशी बोलताना चहल यांनी याबाबत महापालिकेची सविस्तर भूमिका मांडली. ‘लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आम्ही नेहमीच दिवसाला एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, हे लक्ष्य आम्हाला एकदाही गाठता आलेलं नाही. लसीचा तुटवडा हे यामागील कारण होतं. त्यामुळंच आता लसीचा पुरेसा साठा झाल्यानंतरच १८ वर्षांवरील मुंबईकरांसाठी लसीकरण सुरू करण्याचा आमचा मानस आहे. राज्य सरकारलाही आम्ही याबाबत कळवलं आहे,’ असं ते म्हणाले.

‘मुंबईत १८ ते ४४ या वयोगटातील लोकसंख्या ५० ते ६० लाखांच्या घरात आहे. या सर्वांच्या लसीकरणासाठी आम्हाला किमान १ कोटी २० लाख डोसची गरज लागणार आहे. महापालिका स्वत:हून लस घेऊ शकत नाही. त्यामुळंच पुरवठ्याची हमी मिळत नाही तोपर्यंत फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू ठेवण्यात येईल. या निर्णयावरून टीका झाली तरी त्यास सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. कारण, आमची भूमिका व्यवहार्य आहे. लसीचा पुरेसा साठा नसताना लोकांना लसीकरणासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन करणं निरर्थक आहे,’ असं ते म्हणाले.

वाचा: ‘अत्यावश्यक’ म्हणून बनविण्यात आलेली निम्मी ओळखपत्रे बनावट

राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं लसीच्या संदर्भात ‘भारत बायोटेक’ला पत्र लिहिल्याचं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं. राज्यभरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवायची असल्यास सरकारला १२ कोटी डोसची गरज लागणार आहे. त्यामुळं पुढील सहा महिन्यांत कोवॅक्सिनचे (Co Vaccine) नेमके किती डोस उपलब्ध होऊ शकतात व त्याची किंमत काय असेल याची माहिती मागवण्यात आली आहे, असं व्यास यांनी स्पष्ट केलं.

वाचा: मोनिका मोरेने केली करोनावर मात; डॉक्टर म्हणाले…

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bmc-may-not-roll-out-covid-vaccination-drive-on-may-1-said-municipal-chief-i-s-chahal/articleshow/82268756.cms