मुंबई बातम्या

आधी मुंबई लोकलमधून पालघरला परतला, आता शार्दूल ठाकूर मुंबई विमानतळावरुन कुठे गेला? – TV9 Marathi

Shardul Thakur : मुंबई विमानतळावरुन सर्व खेळाडू खासगी गाडीने आपआपल्या घरी रवाना झाले. मुंबई विमानतळावर RTPCR टेस्ट करुन या खेळाडूंना सोडण्यात आलं.

जेव्हा शार्दूल ठाकूरने मुंबई लोकलमधून प्रवास केला होता..

मुंबई : ऑस्ट्रेलियाला (Australia) कसोटी मालिकेत लोळवून टीम इंडिया (Team India) मायदेशी परतली आहे. भारतीय खेळाडूंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. मुंबईत परतलेल्या भारतीय खेळाडूंचं तर विशेष स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे, (Ajinkya Rahane) प्रशिक्षक रवी शास्त्री, सलामीवीर रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि पालघरचा पठ्ठ्या, वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) हे मुंबई विमानतळावर उतरताच, चाहत्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. मुंबई क्रिकेट असोसिएशनने खास केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं.  (When Cricketer Shardul Thakur Preferred Mumbai Local Train)

इकडे माटुंग्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी सण उत्सवाचं वातावरण होतं. ढोल-ताशाचा गजर, रांगोळ्या आणि एकच जल्लोष असं माटुंग्यातील चित्र होतं. सोसायटीतील नागरिकांनी अजिंक्य राहणेचं घरच्या माणसांप्रमाणे स्वागत केलं.

मुंबई विमानतळावरुन सर्व खेळाडू खासगी गाडीने आपआपल्या घरी रवाना झाले. मुंबई विमानतळावर RTPCR टेस्ट करुन या खेळाडूंना सोडण्यात आलं. क्वारंटाईनचे बंधन न लादता, खेळाडूंना घरी सोडण्यात आले.

सर्वजण मुंबईचे, एकटा शार्दूल पालघरचा

हे सर्व खेळाडू खासगी गाड्यांनी आपआपल्या घरी परतले. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि कोच रवी शास्त्री यांचं घर मुंबईतच असल्याने सर्वजण आपआपल्या घरी गेले. मात्र शार्दूल ठाकूर पालघरचा असल्याने तो घरी कसा जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. कारण दोन वर्षापूर्वी शार्दूल ठाकूरचा लोकल रेल्वेचा प्रवास आजही सर्वांच्या लक्षात आहे.

शार्दूल ठाकूर पालघरला न जाता कुठे गेला?

शार्दूल ठाकूर आज मुंबईत उतरल्यानंतर तो पालघरला न जाता मुंबईतील त्याच्या काकांच्या घरी परतला. मुंबई विमानतळावरुन कारने तो विले पार्ले इथे काकांच्या घरी गेला. ऑस्ट्रेलियातून तब्बल 21 तास प्रवास करुन आलेले टीम इंडियाचे विजयीवीर थकले होते. मात्र मुंबईत उतरताच, घरचं स्वागत पाहून त्यांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.

… तेव्हा शार्दूल ठाकूरचा मुंबई लोकलने प्रवास

मार्च 2018 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करुन मायदेशी परतली होती. त्यावेळी शार्दूल ठाकूर हा भारताच्या वन डे आणि टी 20 संघात होता. शार्दूल ठाकूरने ही मालिका गाजवली होती. शार्दूलला एक वनडे आणि दोन टी 20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. वन डे सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. तर दोन टी 20 सामन्यात त्याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या होत्या.

अंधेरी स्टेशनवर तिकीट काढून पालघरकडे लोकलने रवाना 

आफ्रिकेतील धडाकेबाज कामगिरीनंतर शार्दूल ठाकूर टीम इंडियासह मायदेशी परतला. शार्दूल मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर, तिथून थेट अंधेरी रेल्वे स्टेशनवर गेला. अंधेरी स्टेशनवर पालघरचं तिकीट काढून तो लोकल ट्रेनने घरी गेला. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या BCCI चा खेळाडू लोकल रेल्वेने घरी गेल्यानंतर, त्याची जगभरात चर्चा होती. कोणताही बडेजाव न दाखवता शार्दूल ठाकूरच्या साधेपणावर कौतुकांचा वर्षाव झाला होता.

पालघर ते चर्चगेट, शार्दूलचा लोकल प्रवास

शार्दूल ठाकूर हा पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील माहिम-केळवे या गावचा आहे. क्रिकेट हे शार्दूल ठाकूरसाठी जीव की प्राण. त्यामुळेच पालघरच्या या पठ्ठ्याने प्रचंड कष्टाने टीम इंडियाचं दार ठोठावलं. नुकतं दार ठोठावलंच नाही तर जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा धडाकेबाज कामगिरीकरुन माहिम केळवे गावाची दखल ‘गुगल मॅप’लाही घ्यायला लावली. क्रिकेटच्या सरावासाठी शार्दूल ठाकूर दररोज पालघर ते चर्चगेट असा जवळपास अडीच तीन तासांचा प्रवास करायचा.

लोकल प्रवासाची आठवण

एका मुलाखतीदरम्यान, शार्दूल ठाकूरने लोकल प्रवासाची आठवण सांगितली होती. “मी पालघर ते चर्चगेटपर्यंत प्रवास करायचो. गर्दी असायची, किटबॅग असायची. अडीच-तीन तासांचा प्रवास करुन, तिथे जाऊन प्रॅक्टिस करण्यासाठी त्राण नसायचे. पण या प्रवासाने क्रिकेटर म्हणून टफ झालो. काही दिवसांनंतर मुंबईत काका-काकीसोबत राहायला लागलो. त्यामुळे वेळ आणि कष्ट वाचले. वाचलेला वेळ मैदानात घालवू लागलो”, असं शार्दूलने सांगितलं होतं.

विराट म्हणाला, ठाकूर तुला मानलं

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 4th Test) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) चौथा कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यामुळे टीम इंडियाची 6 बाद 186 अशी स्थिती झाली होती. कांगारुंनी पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. यामुळे कांगारुंना दुसऱ्या डावात मोठी आघाडी मिळण्याची संधी होती. मात्र मराठामोळ्या शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि पदार्पणातील वॉशिंग्टन सुंदरने (Washinton Sunder) सातव्या विकेटसाठी शानदार 123 धावांची शतकी भागीदारी केली. या दोघांनीही वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. टीम इंडियाच्या विजयाचा पाया या दोघांनी पहिल्या डावात रचला. या खेळीने टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) शार्दुल ठाकूरचं मराठीत कौतुक केलं होतं. “तुला परत मानलं रे ठाकूर”, असं ट्विट करत विराटने ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरचं कौतुक केलं होतं.

वेस्ट इंडिजविरुद्धही शार्दूलच्या कामगिरीने विराट भारावला

डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात, पालघरच्या शार्दूल ठाकूरने (Virat Kohli Shardul Thakur Marathi) निर्णायक खेळी केली होती. शार्दूलने अवघ्या 6 चेंडूत 17 धावा ठोकल्याने, अवघड वाटणारा हा सामना भारताने 4 विकेट्स आणि 1 ओव्हर राखून सहज जिंकला होता. या विजयामुळे भारतने वेस्ट इंडिजविरुद्धची वन डे मालिका 2-1 ने खिशात घातली. या विजयानंतर मराठमोळ्या शार्दूल ठाकूरचं सर्वत्र कौतुक झालं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने तर शार्दूलचं अस्सल मराठीत (Virat Kohli Shardul Thakur Marathi) कौतुक केलं. कोहलीने या विजयानंतर मराठीत ट्विट करत, “तुला मानला रे ठाकूर” असं म्हटलं होतं.

(When Cricketer Shardul Thakur Preferred Mumbai Local Train)

संबंधित बातम्या  

Shardul Thakur | तुला परत मानलं रे ठाकूर, शार्दूलच्या बॅटिंगवर विराट कोहली फिदा, मराठीत कौतुक

विराट मराठीत म्हणाला, “तुला मानला रे ठाकूर”!  

Source: https://www.tv9marathi.com/sports/when-cricketer-shardul-thakur-preferred-mumbai-local-train-376397.html