मुंबई बातम्या

मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा; ‘ही’ असणार रणनीती – Maharashtra Times

मुंबईः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. भाजप, शिवसेनेनं महापालिका निवडणूकीसाठी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. तर, काँग्रेसनंही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनपक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळं २०२२मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठीही तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढवणार असल्याची चिन्हे असताना मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केली आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून काही धोरणंही आखली आहेत.

विरोधकांवर आता परत जायची वेळ आलीये; शिवसेनेचा फडणवीसांना टोला

मुंबई महापालिकेवर एक हाती काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी काँग्रेसनं तयारी सुरु केली आहे. पालिकेच्या वॉर्डनुसार काँग्रेसनं तयारी केली आहे. प्रत्येक वॉर्डनिहाय आम्ही १०० दिवसांची रणनीती आखली आहे. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मोफत पाणी देण्यासाठी प्रयत्न करु, असं आश्वासन देतानाच भाई जगताप यांनी यामुळं मनपाच्या तिजोरीवर १६८ कोटींचा अधिक भार पडणार असला तरी या रहिवाशांना मोफत पाणी पुरवणे गरजेचं आहे, असंही नमूद केलंय.

वर्षा राऊत यांना पुन्हा समन्स; ‘या’ तारखेला ईडी करणार चौकशी

मुंबई शहरात पाणी माफियांचा सुळसुळाट आहे. यामुळं गरिबांना पिण्याचे पाणी मिळत नाही, असंही जगताप म्हणाले आहेत. तसंच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत झोपडपट्टीवासीयांची घरं नियमित करण्याची घोषणा केली, पण त्याचं पुढं काय झालं?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोणाकडे? अशोक चव्हाण म्हणतात…

मुंबई महानगरपालिकेत आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत पण राज्यात आम्ही सत्तेत आहोत आणि महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. महाराष्ट्र सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालतेय. त्यामुळं महाविकास आघाडी आणि महानगरपालिकाचा काही एक संबंध नाही, असंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रत्येक वॉर्डात जनतादरबार

पुढील १०० दिवसांत काँग्रेस पालिकेतील प्रत्येक वॉर्डात जाऊन तिथं जनता दरबारचं आयोजन करणार आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी रणनीती काँग्रेसनं मुंबई महानगरपालिकेसाठी आखली आहे.

मुंबई सेंट्रल स्थानकाला ‘हे’ नाव देणार; केंद्राकडून नामांतराच्या हालचाली सुरु

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-congress-will-contest-bmc-election-alone/articleshow/80134675.cms