मुंबई बातम्या

नवा करोना: मुंबई पालिका अॅलर्टवर; आयुक्तांनी उचलली ‘ही’ महत्त्वाची पावले – Maharashtra Times

मुंबई: ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खबरदारीच्या उपाययोजनांसाठी तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अनेक महत्त्वाची पावले टाकली आहेत. मुंबईत कोणत्याही परिस्थितीत नव्या करोना विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून सर्वती खबरदारी घेतली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. (BMC Commissioner Iqbal Singh Chahal On New Coronavirus Strain )

वाचा: नव्या करोनाचा धसका; राज्यात पालिका क्षेत्रांत उद्यापासून रात्रीची संचारबंदी

राज्यात उद्यापासून पालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि आखाती देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमधील करोनाच्या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई पालिकेने तातडीने काही पावले टाकली आहेत. आयुक्त चहल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

वाचा: नव्या करोनाची धास्ती : ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानांना स्थगिती

करोनाचा नवा विषाणू कोणत्याही परिस्थितीत येथे येऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. उद्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनंतर ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात एकूण पाच विमाने लंडनमधून मुंबईत येणार आहेत. त्यातून साधारण १ हजार प्रवासी उद्यापर्यंत मुंबईत येतील. या सर्व प्रवाशांना सक्तीने सरकारी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत विविध हॉटेल्समध्ये आम्ही २ हजार रूम्सची व्यवस्था केली आहे, असे चहल यांनी सांगितले. ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्यात येईल. जो प्रवासी करोना पॉझिटिव्ह असेल तर त्याला तिथून थेट सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही चहल यांनी नमूद केले. युरोपातील अन्य देश व आखातातील देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी सात दिवसांचे सक्तीचे क्वारंटाइन असेल. हे क्वारंटाइन संपण्याआधी त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल. ती निगेटिव्ह असेल तरच त्या प्रवाशाला घरी सोडले जाईल, असेही चहल यांनी नमूद केले. युरोप व आखात सोडून अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी होम क्वारंटाइन बंधनकारक असेल, असेही ते म्हणाले.

नवीन करोनाचा धोका लक्षात घेऊन उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ५ जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. संचारबंदीच्या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. ख्रिसमस व थर्टी फर्स्टमुळे अनेक ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असून करोनाचा धोका टाळण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीचे पाऊल उचलण्यात आले आहे, असेही चहल म्हणाले.

वाचा: Explainer करोना विषाणूच्या नव्या प्रकाराने चिंतेचे कारण काय?

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/new-coronavirus-strain-important-decisions-taken-by-mumbai-municipal-corporation-as-a-precaution/articleshow/79842673.cms