मुंबई बातम्या

Mumbai Rains: तो पुन्हा आला! घराघरांत छत्र्यांची शोधाशोध – Maharashtra Times

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. (Mumbai Rains) मुंबई व ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. ठाण्याच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्यामुळं आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच गोची झाली. घराबाहेर पडण्याआधी पेट्या, कपाटं आणि घरातील पोटमाळ्यांवर शोधाशोध करून पुन्हा एकदा छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. (Rain in Maharashtra)

भारतात सर्वसाधारणपणे पावसाळा, उन्हाळा व हिवाळ्याचे महिने ठरलेले आहेत. त्या-त्या महिन्यात साधारणपणे तो-तो ऋतू असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्रात बरेच बदल झालेले दिसत आहेत. जूनमध्ये सुरू होणारा मान्सून पुढेपुढे सरकू लागला आहे. तर, सप्टेंबरपर्यंत गायब होणारा पाऊस ऑक्टोबरपर्यंत ठाण मांडू लागला आहे. यंदा तर पावसानं कमाल केली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही हिवाळी महिन्यात पावसानं कुठे न कुठे हजेरी लावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रिमझिम सुरू आहे. शनिवारी सकाळी पावसानं मुंबई, पुणे व कोकण किनारपट्टीवर हजेरी लावली होती. आजही त्याचीच पुनरावृत्ती झाली. या पावसात जोर नसला तरी छत्रीशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, अशी गोची करून ठेवली आहे.

वाचा: फुकट घरं मिळणार अशी अफवा पसरली आणि…

दक्षिण मुंबईत काल मध्यरात्री चांगल्या सरी कोसळल्या. त्यानंतर आज सकाळपासून उपनगरांमध्ये रिमझिम सुरू आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये पाऊस सुरू आहे. पनवेलमध्ये देखील जोरदार सरी कोसळल्या.
सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत असलेल्या नाशिक शहरात रविवारी रात्रीपासूनच पाऊस होत आहे. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तिथं ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील अनेक भागांत रिमझिम सुरू आहे. आर्द्रता ९१ टक्क्यांवर असल्यानं शहरात धुकंही दाटलं आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-thane-navi-mumbai-palghar-raigad-and-nashik-received-moderate-rain/articleshow/79714513.cms