मुंबई बातम्या

बम्बईची भाषा हात धरून शिकवावी लागत नाही.. बोले तो एकदम ढिन्च्यॅक! – Maharashtra Times

संतोष पवार

बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्यावर अनेक संस्कार होतात. त्यापैकी महत्त्वाचा संस्कार म्हणजे भाषेचा संस्कार. कारण कितीही शिका, कितीही भारीतले कपडे घाला, महागड्या गाडीतून फिरा. माणसाचं स्टेटस ठरतं ते त्याच्या भाषेवरून. म्हणूनच इतर भाषा आपल्या बाळाला यावी म्हणून आई-बाबा आटापिटा करतात. पण, बम्बईया भाषा आणि त्या भाषेतले शब्द बाळाच्या कानावर पडू नये म्हणून धडपडत असतात. पण होतं उलटंच! पोरगं इतर भाषा शिकताना का-कु करतं. पण, बम्बईया भाषा आपोआप आत्मसात करतं. कारण, मुलाच्या डोक्यात कधीतरी कुठे तरी रुजलेल्या बम्बईया भाषेच्या बीजाला वेगवेगळ्या मार्गाने खत-पाणी मिळत असतं आणि त्या मार्गातला समृद्ध महामार्ग म्हणजे हिंदी चित्रपट!

ज्या काळात श्रीमंत-गरीबमधल्या संघर्षात नायक किंवा नायिका गरीब वाटण्यासाठी बम्बईया भाषेत बोलायचे. त्याकाळात गरीब माणसं हीच भाषा बोलून स्वतः नायक-नायिका असल्यासारखे फिल करायचे. त्यामुळे नकळत बम्बईया भाषेला स्टेट्स मिळालं ‘गरिबांची भाषा’. तर आपल्याला नडणाऱ्या गरिबांची ही भाषा श्रीमंताना गुंडांची भाषा वाटू लागली होती. पण, गरिबांना त्याची फिकीर नव्हती. त्यांना कोणाचीही मक्तेदारी नसलेली, त्यांची स्वतःची अशी भाषा मिळाली होती. जी फुकट शिकता येत होती. ही भाषा शिका किंवा शिकू नका अशी कोणीही जबरदस्ती करत नव्हतं. त्या भाषेवर ही भाषा आमची आहे असा कोणी हक्क सांगू शकत नव्हतं. तसा कोणी दावा करू शकत नव्हतं. पण, चित्रपटातील गरीब मुलीच्या नैसर्गिक सौंदर्याच्या प्रेमात श्रीमंत मुलानं पडावं, त्याप्रमाणे खऱ्याखुऱ्या श्रीमंतांच्या मुलांना या गरिबांच्या भाषेमधल्या सहजतेनं भुरळ घातली आणि स्टेटसचा विचार न करता श्रीमंतांची मुलसुद्धा बम्बईया भाषा बोलू लागली. ‘अबे हटा सावन की घटा…खा खुजा…बत्ती बुजा…चुपचाप सो जा इंटूकले पिंटूकले, खा रहेली है आंटी…बजा रहेली है घंटी, खुल्ला घुमके पश्चिम को पलटले…बहोत हो गया फुटले…वटले, शाना बन क्या ही अशी शब्दफळं या भाषेच्या झाडाला येऊ लागली आणि रोज येतायत. हे कोणत्याही शब्दसंग्रहात सापडणं मुश्कील. त्यामुळे या शब्दांचा अर्थ सापडणं तर महामुश्कील! पण, नवनवीन शब्द असूनही बोलणाऱ्याला काय बोलायचंय हे ऐकणाऱ्याला बरोबर कळतं. म्हणूनच ही भाषा फोफावली.

बम्बईया भाषेचा कोणालाही मान-अभिमान नसल्यानं वेगाचं आकर्षण असणाऱ्या, संवादाला चॅटिंग म्हणणाऱ्या पिढीनं कित्येक शब्दांचं नव्यानं बारसं घातलं. लांबलचक शब्द बोलण्याचा कंटाळा करत कित्येक शब्द शॉर्ट करून टाकले. देवाला हाक मारताना ‘ओ माय गॉड’ ऐवजी OMG बोलू लागले. चर्चगेटच ‘चर्ची’, एल्फिस्टनचं ‘एल्फी’ झालं. तसं ब्रदर ‘ब्रो’ आणि सिस्टरची ‘सीस’ झाली. हुशारचा ‘शाना’ झाला, ग्रुप मेंबरचं ‘फंटर’ झालं. ‘त्याला काही माहीत आहे की नाही?’ अशा प्रश्नावर ‘घंटा’ एवढंच उत्तर मिळू लागलं. सुंदर मुलगा ‘छावा’ तर सुंदर मुलगी ‘मस्त आयटम’ वाटू लागली. ‘गेट आऊट’ म्हणत अपमान करण्यापेक्षा ‘चल हवा आन दे’ म्हणत समज दिली जाऊ लागली. ‘खर्चा पाणी दु क्या? दिमाग की नस मत खीच, खोपचे में लू क्या?’ अशा वाक्प्रचारांच्या प्रचारा बरोबरच ‘सुमडी में कोंबडी, हवा टाइट, ढिन्चाक, रापचिक, ढक्कन, चमाट, वटकले, कलटी मार’ अशा अगम्य शब्दांची निर्मिती होऊ लागली. ती कोणी केली? कोणाला माहीत नाही आणि ते शोधण्यातही कोणाला रस नाही.

मराठीत तर ‘आपल्या चड्डीत रहायचं’ असं म्हटलं जाऊ लागलं. पण, हे असे शब्द रुजले आणि फोफावले. या शब्दांचं वैशिष्ट्यं हे की या शब्दांनी कोणीही घायाळ होत नाही. कोणाला काही आक्षेपार्ह्य वाटत नाही. चिथावणी खोर असे हिंसक शब्द नाहीत. कोणाला टोचतील असे खोचक शब्द नाहीत. कोणी दुखावतील असे टोमणे नाहीत. ना अश्लीलता आहे ना शिव्याशाप. ही भाषा सगळ्यांनाच ऐकायला अन् बोलायला आवडते. पण, तरीही ही भाषा टपोरी भाषा म्हणून बदनाम आहे. पर चलता है, जिसका नाम होताय वहीच बदनाम होताय! तो भिडू लोग ऐसे ‘पॉझिटीव्ह’ नोट पे ये लेख का ‘दी एंड’ हो गएला है ऐसा समजनेका, पर लाइफ ऐसेच शुरु रखनेका, बोले तो अपने स्टाइल में और जो अपुनको अच्छा लगताय वहीच करनेका और वहीच बोलनेका!

(समाप्त)

Source: https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/marathi-director-santosh-pawar-talks-about-mumbai-language-and-hindi-movie/articleshow/79718188.cms