मुंबई बातम्या

चिंताजनक! मुंबईत बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे वाढले – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या कालावधीत महिलांवरील अत्याचार वाढले असून विशेषकरून बलात्कार आणि विनयभंग या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे आहे. २०१८-१९च्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यात २४ तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत २५ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे मुंबई पोलिस दलामध्ये मंजूर पदापेक्षा सुमारे ९२८० पोलिसांच्या कमतरता असून कमी मनुष्यबळाचा परिणाम गुन्ह्यांच्या तपासावर होत आहे.

प्रजा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्हे यावरील २०१९-२० या कालावधीचा अहवाल प्रकाशित केला. यामध्ये मुंबईतील पोलिसांची संख्या, गुन्ह्यांची आकडेवारी, तपासाविना असलेले गुन्हे, दोषसिद्धी प्रमाण याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी बलात्कार आणि विनयभंग यांसारखे गुन्हे वाढले आहे. २०१८-१९ या वर्षात बलात्काराचे ७८४ गुन्हे तर विनयभंगाचे २५३३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१९-२० या वर्षात बलात्काराचे ९०४ तर विनयभंगाचे २६७७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हत्येचा गुन्ह्यामध्ये एक ने घसरण झाली असून २०१९-२० मध्ये १६४ हत्येचे नोंदविण्यात आले आहेत. दंगल, सोनसाखळी चोरी, घरफोडी, चोरी, वाहनचोरी या गुन्ह्यांमध्येही घेत झाल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

मुंबई पोलिस दलामध्ये ५१,०६८ इतकी पदे मंजूर आहेत मात्र ४१७८८ पोलिस प्रत्यक्षात कार्यरत आहेत. फॉरेन्सिक लॅबमध्येही कर्मचाऱ्यांची कमतरता असून मंजूर पदांपेक्षा १७७ कर्मचारी कमी आहेत. याचा परिणाम तपासावर होत असून २०१९-२० च्या अखेरीपर्यंत ६४ टक्के गुन्हे तपासाविना पडून आहेत. याचा परिणाम पुढे प्रकरणांच्या दोषसिद्धीवरही होत असून हे प्रमाणही घटले आहे.

गुन्हा दाखल होण्यापासून त्याचा निकाल लागण्याचा कालावधी २००८ ते २०१२ या कालावधीत साधारण २५.८ महिने होता मात्र २०१३ ते २०१७ या वर्षात हा कालावधी जवळपास दुप्पट म्हणजेच ४०.४ महिने इतका झाला आहे.

करोनामुळे ९० पोलिसांचा मृत्यू

२०१९-२० या आर्थिक वर्षांत वेगवेगळ्या आजाराने १३९ पोलिसांचा मृत्यू झाला होता. एप्रिलपासून ऑक्टोबर पर्यंतच्या सात महिन्याच्या कालावधीत १६५ पोलिस मृत्युमुखी पडले असून यातील सर्वाधिक ९० पोलिसांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. करोना विषाणूच्या संसर्गामुळे पोलिस मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

पुराव्यांअभावी सुटले ८० टक्के आरोपी

गुन्हे साक्ष फिरवली तक्रार मागे घेतली संशयाचा फायदा पुराव्यांचा अभाव

बलात्कार ९% ३% १२% ७७%

अपहरण १०% ५% ७% ७८%

हत्या ९% ० १३% ७८%

हत्येचा प्रयत्न १९% ० १२% ६८%

गंभीर दुखापत १४% ० ९% ७७%

दरोडा ० ० १२% ८८%

इतर ५% ० ११% ८४%

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/atrocities-against-women-increases-by-24-percent-in-mumbai/articleshow/79464555.cms