मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’च्या पदवी परीक्षांमध्ये तांत्रिक समस्या – Maharashtra Times

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्ष परीक्षेला शनिवारपासून सुरुवात झाली. मात्र विद्यापीठाच्या एटीकेटी परीक्षांप्रमाणेच याही परीक्षांना तांत्रिक अडचणींमुळे हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली त्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केल ेआहे. सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांपैकी दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांना शनिवारी पहिल्याच दिवशी परीक्षा देता आलेली नाही.

मुंबई विद्यापीठाकडून एटीकेटीच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाली तरी लॉग-इन आयडी आणि पासवर्डची लिंक मिळत नाही. त्यामुळे एटीकेटीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यातच शनिवारपासून सुरू होत असलेल्या आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. परीक्षेच्या लिंकचा लॉग-इन आयडी आणि पासवर्ड हा २४ तास अगोदर विद्यार्थ्यांना पाठवणे आवश्यक असतानाही शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना कोणताही लॉगइन आयडी व पासवर्ड मिळालेला नव्हता. लॉगइन आणि पासवर्डचा मेल विद्यार्थ्यांना २४ तास अगोदर मिळणे अपेक्षित होते, पण असे मेल विद्यार्थ्यांना आले नाहीत. ज्यांना हे मेल आले, त्यापैकीदेखील अनेक विद्यार्थ्यांना लॉगइन करता आले नाही. यातच विद्यापीठाच्या वेबसाइटवर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर दूरध्वनी केला असता त्यातील दोन लाइन दिवसभर बंद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉग-इन आयडी व पासवर्ड का मिळत नाही, याबद्दल काहीच माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले.

कॉलेजे सुरू होणार का? केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स

अखेरच्या क्षणाला किंवा परीक्षा सुरू झाल्यानंतर लिंक मिळाल्यावर आम्हाला वेळेत परीक्षा देता येईल का? अचानक लिंक आल्यास आमचा गोंधळ उडू शकतो, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत उडालेल्या गोंधळामध्ये कुलगुरूंनी व्यक्तिगत लक्ष घालून ही समस्या सोडवावी. यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अभाविप तर्फे करण्यात आली आहे.

पोस्टात मोठी भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी

दरम्यान, काही तांत्रिक कारणास्तव विद्यार्थ्यांना लिंक मिळालेली नाही. ज्यांना लिंक मिळालेली नाही त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/thousands-of-students-missed-the-exam-as-technical-glitch-in-mumbai-university-idol-final-year-exams/articleshow/78461911.cms