मुंबई बातम्या

मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा – Maharashtra Times

मुंबई: मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करून त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याचं आव्हाड म्हणाले.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मंत्री आपल्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतात. जितेंद्र आव्हाडांनी आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील टागोर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा मानस गृहनिर्माण मंत्र्यांचा आहे. यासंदर्भात आव्हाड हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरात मोकळे भूखंड ताब्यात घेणार आहे.

मुंबईत जे रिक्त भूखंड आहेत, त्याबाबतचे वाद न्यायप्रविष्ठ आहेत. अशा वाद असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरं बांधता येतील, असं ते म्हणाले. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घर/सदनिका उपलब्ध करुन देता येतील. म्हाडाने ३० ते ४० वर्षापूर्वी कन्नमवार नगरसारख्या भागात म्हाडाच्या गांधीनगर, मोतीलाल नगर यासारख्या ५६ वसाहती उभ्या केल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे सरकार आहे की ईस्ट इंडिया कंपनी?; आशिष शेलारांचा टोला

यावेळी आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं हे माझ्या सारख्या मराठी मातीवर प्रेम करणाऱ्यांना कदापि आवडणार नाही, असं सांगतानाच टोकाचे मतभेद असू शकतात, पण म्हणून कुणीही कुणाबद्दल पातळी सोडून बोलू नये, असंही ते म्हणाले.

कांदा निर्यातबंदी: शरद पवारांनी केंद्राला करून दिली ‘या’ धोक्याची जाणीव

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mhada-to-build-affordable-houses-in-thane-and-mumbai-said-jitendra-awhad/articleshow/78121966.cms