मुंबई बातम्या

मुंबई गारठली! दिवसाही हुडहुडी भरवणारी थंडी, तापमानाचा पारा १६ अंशांपर्यंत आणखी घसरण्याची शक्यता – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • उत्तर भारतातही थंडीची लाट आली आहे. मुसळधार पावसानंतर, उत्तर भारतातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
  • आणखी दोन दिवस मुंबईत आभाळ ढगाळलेले आणि किमान तापमान १६ अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे

मुंबई: एरवी सतत दमट हवामान आणि उकडा नशिबी असणारे मुंबईकर गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे गारठून गेले आहेत. मुंबईत रविवारी तापमानाचा पारा १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. आगामी दिवसांमध्ये तापमानाचा हा पारा आणखी घसरुन १६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबईत नुकताच अवकाळी पाऊस झाला होता. शहरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. तसेच अधुनमधून मुंबईत ढगाळ वातावरण दिसत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये तापमानाचा पारा सातत्याने घसरत आहे.

मुंबईमध्ये रविवारी सांताक्रूझ येथे १८.२ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे १९.५ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. कमाल तापमानाचा पारा दिवसभरात आणखी उतरून सांताक्रूझ आणि कुलाबा दोन्ही ठिकाणी २६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आणखी दोन दिवस मुंबईत आभाळ ढगाळलेले आणि किमान तापमान १६ अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातही थंडीची लाट आली आहे. मुसळधार पावसानंतर, उत्तर भारतातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याने असेही म्हटले आहे की, पुढील ४८ तासांत पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि पुढील २४ तासांत उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काही भागांमध्ये बर्फवृष्टीही होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

‘पश्चिमी प्रकोपाचा प्रभाव कमी झाल्याने गारठा वाढला’

यंदा डिसेंबर व जानेवारी दोन्ही महिन्यांमध्ये मुंबईनेही पाऊस अनुभवला. त्यामुळे याची तीव्रता अधिक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पश्चिमी प्रकोपाचा परिणाम भारतावर वर्षभर जाणवत असतो. मात्र तो हिवाळ्यात अधिक प्रकर्षाने जाणवतो. पावसाळ्यामध्ये या प्रभावाकडे दुर्लक्ष होते. हिवाळ्यामध्ये उत्तरेमध्ये पश्चिमी प्रकोपामुळे पाऊस पडून त्यातून पिकासाठी मदत होते. मात्र, सध्या राज्यामध्ये असलेल्या पश्चिमी प्रकोपाची प्रणाली ही अधिक दक्षिणेकडून पुढे सरकल्याने मुंबईमध्ये पाऊस पडला. पावसाळ्यानंतर चक्रीवादळाच्या परिणामाने मुंबईमध्ये पाऊस पडू शकतो. मात्र, पश्चिमी प्रकोपामुळे मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता कमी असते. याचा प्रभाव विदर्भ, मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्रात अधिक जाणवतो, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

पश्चिमी प्रकोपासोबतच वायव्य भारताजवळ चक्रीय वातस्थिती निर्माण झाली. त्यातून अरबी समुद्रातून बाष्प खेचून घेतल्याने पावसाळी परिस्थिती निर्माण झाली. पश्चिमी प्रकोपाची स्थिती निर्माण झाल्यामुळे तापमानात वाढ झाली आणि आता या परिस्थितीचा प्रभाव राज्यात कमी होत असल्याने पुन्हा गारठा निर्माण झाल्याचे होसाळीकर यांनी सांगितले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/weather-alert-temperature-may-drop-to-16-degree-celsius-in-mumbai/articleshow/88803010.cms