मुंबई बातम्या

हवाईदलाचे ‘मुंबई डिफेन्डर्स’ सज्ज – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय असल्याने सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी ही नौदलावरच असते. पण, आता हवाईदलही मुंबईच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे संरक्षकाच्या भूमिकेत आली आहे. ‘मुंबई डिफेन्डर्स’ ही हवाईदलाची तुकडी पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. भारतीय हवाईदलाच्या ८ ऑक्टोबर या स्थापना दिनाच्या निमित्ताने हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळेच शहराची सुरक्षा सामरिकदृष्ट्या अत्याधिक महत्त्वाची आहे. त्यासाठीच काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांची (एनएसजी) विशेष तुकडी येथे कायमस्वरूपी उभी करण्यात आली. त्याखेरीज भूदलाची विशेष विमानविरोधी तोफांची तुकडीदेखील मुंबईत आहे. परंतु, ही तुकडी प्रामुख्याने केवळ विमानतळाच्या सुरक्षेसाठी कार्यान्वित आहे. मात्र, त्याखेरीज आता हवाईदलही विशेष तुकडीसह तैनात झाले आहे.

हवाईदलाचे एक केंद्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील कनेरी हिल्स येथे तैनात आहे. तेथे हवाईदलाचे प्रामुख्याने रडार आहे. तर ठाणे शहरातील कोलशेत खाडीजवळ हवाईदलाचा विशेष तळदेखील आधीपासूनच आहे. पण, आता या तळाला पूर्ण रूपातील हवाईतळाचा दर्जा दिला जात आहे. त्यामुळेच आधी केवळ प्रशासकीय तळ म्हणून ओळख असलेला तळ आता एक ‘ऑपरेशनल’ तळ झाला आहे. हवाईदलाच्या ‘एमआय १७ व्ही ५’ या अत्याधुनिक हेलिकॉप्टरची तुकडी आता तेथे तैनात करण्यात आली असून, ती कार्यान्वित झाली आहे. चार हेलिकॉप्टर तेथे तैनात करण्यात आली आहेत. त्याखेरीज कनेरी हिल्सवरील रडारचा नियंत्रण कक्षदेखील याच तळावर कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळेच या तुकडीला ‘मुंबई डिफेन्डर्स’, असे नाव देण्यात आले आहे.

बालाकोट हल्ल्यानंतर सज्जता

बालाकोट येथील दहशतवादी तळावर भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून प्रत्युत्तर दिले जाणार, असे संकेत होते. त्यावेळी मुंबईची सुरक्षा प्राधान्यावर होतीच. या सुरक्षेसाठी विशेष क्षेपणास्त्र यंत्रणादेखील ठाण्यातील याच तळावर तैनात करण्यात आली. त्यामुळेच हा तळ सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-defenders-air-force-for-the-security-of-mumbai/articleshow/86856666.cms