मुंबई बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचं धुमशान, मुंबई चिंब, विदर्भ मराठवाड्यात तुफान, चाळीसगावावर… – TV9 Marathi

राज्याला काल पावसाने झोडपून काढले. राजधानी मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पाऊस झाला.

महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस

मुंबई : राज्याला काल पावसाने झोडपून काढले. राजधानी मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज अतिशय अचूक ठरला. धो धो पावसाने अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय. महापुरातून सावरलेल्या चाळीसगावात पुन्हा जोरदार पावसाने नद्या नाल्यांना पूर आलाय. मुंबई, नागपूर, बुलडाणा, जामनेर, लातूर, नाशिक सगळीकडेच पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली.

राज्याच्या सर्वच विभागांत पाऊस धो धो बरसला. यामुळे कुठे पिकांना जीवदान मिळालं तर कुठे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झालंय. कुठे रस्ते वाहून गेलेत, तर कुठे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

चाळीसगाव शहरावर पुन्हा नद्या कोपल्या

महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या चाळीसगाव शहरावर पुन्हा नद्या कोपल्या आहेत. चितूर डोंगरी नदीने पुन्हा उग्ररूप धारण केलं असून पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. शिवाजी घाट, आण्णाभाऊ साठे नगर, नगर भिल्ल वस्ती, इच्छादेवी नगर,गवळीवाडा, हा भाग पूर्ण पाण्याखाली गेला आहे. रात्री दोन वाजेपासून नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली शहरातील दोन्ही पुलांवरून प्रचंड वेगाने साधारण 8 फूट पाणी वाहत असल्याने जुन्या गावाशी नव्या गावांचा संपर्क तुटला आहे. आता पुराचे पाणी काहीसं ओसरु लागलं असून या सगळया पावसाने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय.

[embedded content]

जामनेरमध्ये चक्रीवादळासह मुसळधार पाऊस

जामनेर तालुक्यात चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. तालुक्यातील ओझर-टाकरखेडा-हिंगणे-टाकळी बुद्रुक – हिवरखेडा सह चार ते पाच गावांना चक्रीवादळाचा फटका बसला. ओझर गावातील सुमारे 90 टक्के घरांवरील पत्रे उडून घरांची पडझड झाले असून घरातील संसारोपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे. तर भाग्दरा गावाजवळील तलाव फुटल्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरल्याने शेतीचेही नुकसान झाले.

औरंगाबादमध्ये पाणीच पाणी चोहीकडे

औरंगाबादच्या फुलंब्री शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून औरंगाबाद जळगाव महामार्गावर गुडगा भर पाणी आल्याने वाहतूक काही काळ मंदावली होती. शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले होते. खुलताबाद फुलंब्री महामार्गावर पाणीच पाणी झाले असून दुकानात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं.
या महामार्गाचे नवीन काम झाले असले तरी साईड नाली व्यवस्थित तयार न झाल्याने आणि छोटी केल्याने डोंगरावरील पाणी तसेच छोट्या नाल्याचे पूर्ण पाणी महामार्गावर आले.

[embedded content]

बुलडाण्यात पूरस्थिती

महाराष्ट्राच्या विविध भागांत जसा पाऊस कोसळला तसाच पाऊस बुलडाण्यात देखील कोसळला. जोरदार पावसाने बुलडाण्यातल्या काही भागांत पूरस्थिती सारखी परिस्थिती उद्भवली. अनेक गावांना पुराचा फटका बसला.

[embedded content]

मुंबईमध्ये पावसाची बॅटिंग

मुंबईत काल सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. थोड्या-थोड्या वेळाच्या विश्रांतीने मुंबईत काल तुफान पाऊस पडला. संध्याकाळी 6 नंतर पावसाने आक्रमक रुप धारण केलं. सायंकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरु होती. दादर-परेल-सायन-माटुंगा-सीएसटी-कांदिवली-मालाड-गोरेगाव-जोगेश्वरी-अंधेरी बोरीवली येथे पावसाची संततधार पाहायला मिळाली. रात्रभर मुंबईसह मुंबईच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला.

[embedded content]

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पूर स्थिती निर्माण झाली आहे. पावसाची संततधार सुरुच आहे. लातूर जिल्ह्यातल्या मांजरा ,रेणा, तेरणा , तिरु , घरणी आणि मन्याड अशा सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत . रेणापूर तालुक्यातल्या रेणा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. रेणा नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर अहमदपूर तालुक्यातल्या चिखली जवळचे दोन पाझर तलाव फुटले आहेत. फुटलेल्या पाझर तलावाच्या प्रवाहात जनावरे वाहून गेली आहेत. जळकोट तालुक्यातल्या ग्रामीण भागात काही ठिकाणी ओढ्याचं पाणी पुलावरून वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. औसा-रेणापूर आणि निलंगा तालुक्याच्या अनेक गावातील ऊस आणि सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

[embedded content]

जळगावात तुफान पावसाने अनेक ठिकाणी नुकसान

जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. भुसावळ येथे राम मंदिर वार्ड परिसरात दोन मजली जुनी इमारत कोसळली असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र भुसावळ शहरात अनेक ठिकाणी जुन्या इमारती असल्याने जुन्या इमारती वर नगरपालिकेच्या वतीने कारवाईचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. ही इमारत पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळला आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात ओझर , सामरोद , तळेगाव , मोयखेडा दिगर या परिसरात तुफान पावसाने झोडपले. त्यामुळे ओझर गावात तर संपूर्ण वृक्ष उन्मळून कोसळला. तर अनेक गावातील रस्त्यांना पूर आल्यामुळे नागरिकांच्या घरात व दुकानांमध्ये पाणी घुसले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. केळीच्या बागा , कपाशी, ज्वारी, मका वादळी वारा व पावसामुळे जमीनदोस्त झाल्या.

[embedded content]

(Maharashtra Rain Update Mumbai Vidarbha marathawada heavy rain live update)

हे ही वाचा :

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/maharashtra-rain-update-mumbai-vidarbha-marathawada-heavy-rain-live-update-531175.html