मुंबई बातम्या

मुंबई विमानतळ ताब्यात घेतलेल्या गौतम अदानींना व्यवसायात मोठा आर्थिक फटका – TV9 Marathi

Adani Groups| गेल्या आर्थिक वर्षात देशातील 138 विमान विमानतळांना साधारण 2883 कोटींचा तोटा झाला. 2019-20 या आर्थिक वर्षात 136 विमानतळांच्या कारभारातील नुकसानीचा आकडा 80 कोटी तर 208-19 या आर्थिक वर्षात हाच आकडा 466 कोटी रुपये होता.

अदानी समूह

मुंबई: देशातील प्रमुख विमानतळांचा कारभार ताब्यात घेऊ पाहणारे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Adani Group) यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या कोरोनामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे हवाई सेवा क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण आहे. गेल्या आर्थिक वर्षात या क्षेत्राला प्रचंड नुकसान सहन करावे लागले. याचा फटका देशातील प्रमुख विमानतळांचा कारभार सांभाळणाऱ्या अदानी समूहाला बसला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात देशातील 138 विमान विमानतळांना साधारण 2883 कोटींचा तोटा झाला. 2019-20 या आर्थिक वर्षात 136 विमानतळांच्या कारभारातील नुकसानीचा आकडा 80 कोटी तर 208-19 या आर्थिक वर्षात हाच आकडा 466 कोटी रुपये होता. ही आकडेवारी पाहता यावेळी तोट्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळ सर्वात फायदा मिळवून देणारे ठरले होते. तर दिल्ली आणि मुंबई विमानतळाच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. पुणे विमानतळाचा कारभार सध्या AAI अर्थात एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे आहे.

मुंबई विमानतळावर सर्वाधिक नुकसान

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवसायाला कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षात मुंबई विमानतळाच्या व्यवसायात 384.81 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाच्या व्यवसायात 317.41 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही विमानतळांमध्ये एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचा हिस्सा अवघा 26 टक्के आहे. तर मुंबई विमानतळाची 74 टक्के हिस्सेदारी अदानी समूहाकडे आहे.

सर्वाधिक नुकसान झालेली पाच विमानतळे कोणती?

कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या विमानतळांच्या यादीत मुंबई अग्रस्थानी आहे. याठिकाणी 384.81 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यानंतर चेन्नई 253.59 कोटी, त्रिवेंद्रम 100.31 कोटी, अहमदाबाद 94.1 कोटी या विमानतळांचा समावेश आहे.

सर्वाधिक फायद्यात असलेली पाच विमानतळे कोणती?

कोरोनाकाळातही पुणे विमानतळाच्या व्यवसायात बरकत कायम राहिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळाच्या व्यवसायात 16.09 कोटी, जुहू विमानतळ 15.94 कोटी, श्रीनगर विमानतळ 15.94 कोटी, पाटणा विमानतळ 6.44 कोटी आणि कानपूर विमानतळाच्या व्यवसायात 6.07 कोटी रुपयांचा फायदा झाला. श्रीनगर आणि कानपूरच्या विमानतळाचा कारभार सध्या भारतीय हवाई दलाकडे आहे.

संबंधित बातम्या

‘महाराजा’साठी कोण बोली लावणार? हिंदूजा, टाटा की अदानी?

मुंबई विमानतळ अखेर अदानी समूहाच्या ताब्यात, देशातील 4 विमानतळांवर नियंत्रण

मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत नेणार का?, अदानी समूहाकडून मोठा खुलासा

(Adani Group incur major loss after takeover of Mumbai Airport)

Source: https://www.tv9marathi.com/business/adani-group-in-loss-after-takeover-mumbai-airport-500506.html