मुंबई बातम्या

…तर मुंबईत प्रशासकीय राजवट येणार – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीचे भवितव्य हे पूर्णपणे करोनावर अवलंबून आहे. संसर्ग नियंत्रणात राहिला तरच निवडणूक होऊ शकेल. संसर्ग कायम असल्यास पालिका बरखास्त करून प्रशासकीय राजवट अटळ आहे. सर्व प्रशासकीय अधिकार आयुक्तांच्या हाती एकवटतील. स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यानुसार राज्य सरकार याबाबत अंतिम आणि आवश्यक निर्णय घेऊ शकते.

पालिकेच्या निवडणुकीला अद्याप ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होणार की पालिकेला मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलली जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी १९९० ते ९२ अशी दोन वर्ष पालिकेला मुदतवाढ देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विद्यमान परिस्थितीत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र तीन दशकानंतर नगरविकास विभागातील कायद्यांमध्ये मोठे फेरबदल झाले असून नगरविकासच्या विद्यमान नियमावलीनुसार कोणत्याही पालिकेला मुदतवाढ न देता बरखास्त करण्यात येत असल्याचे नगरविकास विभागासंबंधी जाणकारांनी स्पष्ट केले आहे.

यासाठी नवी मुंबई महापालिकेचा दाखला देण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक मार्च २०२० मध्ये होणार होती. याचदरम्यान मुंबई, नवी मुंबईसह देशात करोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे नवी मुंबई महापालिका बरखास्त करण्यात आली असून मागील चौदा महिन्यांपासून नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे. पालिका आयुक्तांना दर ६ महिन्याने मुदतवाढ दिली जाते आहे. आतापर्यंत तेथील आयुक्तांना तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींचे सर्व अधिकार आणि निधी वाटप गोठवण्यात आले असून सर्व प्रकारचे महत्त्वाचे निर्णय पालिका आयुक्त घेत आहेत.

मुंबईत ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये करोनाच्या तिसर्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. या दरम्यान लाट आल्यास पुढे ६ महिने उपाययोजनेत जाण्याची शक्यता असल्याने पालिकेत प्रशासकीय राजवट अटळ असल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यान, पालिकेच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले असून त्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत जनगणना, प्रभागनिहाय सुधारित मतदार याद्या, वॉर्डांची संरचना बदल, आरक्षण याबाबत चर्चा करण्यात आली अशी माहिती पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याबाबत निर्देश दिल्यास पालिका तयार आहे, असे धामणे यांनी स्पष्ट केले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/thackeray-government-will-be-take-final-decision-about-bmc-election-2022/articleshow/83054305.cms