म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
करोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी वेगाने लसीकरण होण्याची गरज आहे. आरोग्य, फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनंतर ज्येष्ठ नागरिक आणि आता तरुणांचे लसीकरण सुरू झाले असले तरीही राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यामध्ये मुंबईचा क्रमांक सातवा आहे. पहिला क्रमांक कोल्हापूरचा लागला आहे.
सन २०२१ मधील मध्य वार्षिक लोकसंख्या १ कोटी तीस लाख ७ हजार ४४३ इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यातील ४५ वर्षांवरील व्यक्तींची संख्या ३९ लाख २ हजार २३३ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी १५ लाख ५२ हजार ३४७ व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला असून हे प्रमाण ३९.७८ टक्के इतके आहे. राज्यात पहिल्या क्रमांकावर कोल्हापूर असून येथे ४५ वर्षांवरील ७ लाख ३६ हजार ६८८ जणांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या लोकसंख्येचे प्रमाण १२ लाख ७३ हजार ५६५ इतके आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ५७.८४ टक्के इतके आहे. सांगलीमध्ये ४ लाख ३७ हजार ९५४ म्हणजे ४७.५३ टक्के, तर साताऱ्यामध्ये हे प्रमाण ४ लाख ४८ हजार ६२९ इतके म्हणजे ४६.५८ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. राज्यात या निकषांतर्गत पहिला डोस पूर्ण करण्यात पुण्याचा क्रमांक चौथा असून येथे ४४.११ टक्के व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. ठाण्यात या वयोगटातील आठ लाख व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. हिंगोलीमध्ये ही टक्केवारी सर्वांत कमी म्हणजे ९.५२ टक्के इतकी, तर त्यानंतर पालघर, गडचिरोली, नंदुरबार येथे हे प्रमाण अकरा टक्के नोंदवण्यात आले आहे. राज्यातील लसीकरणाच्या पहिल्या मात्रेची ही स्थिती २८ एप्रिलपर्यंतची आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा साप्ताहिक दर ३० जून रोजी ३.३२ टक्के इतका होता, तर ३० सप्टेंबर रोजी तो १.३१ टक्क्यावर गेला. ३१ जानेवारी होजी हे प्रमाण ०.१२ टक्के, तर ३१ मार्च रोजी रुग्णवाढीचा दर १.३३ टक्के इतका नोंदवण्यात आला. २७ एप्रिल रोजी हे प्रमाण १.५५ टक्के होते. रुग्णवाढीचा दर लक्षात घेता संसर्ग क्षमता वाढल्याचे दिसून येते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जून महिन्यामध्ये ५२.३२ टक्के इतके होते. ते एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत ८३.२१ टक्के इतके वाढले आहे. याला लसीकरणाची साथ मिळाली तर संसर्गाचा वेग अधिक जलदरित्या नियंत्रणात येईल याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. लशींची उपलब्धता वाढली तर अधिक वेगाने लसीकरण करता येईल, अशी अपेक्षा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली.
राज्य – पहिला डोस – दुसरा डोस
महाराष्ट्र – १,३०,४५,००० – २२,९२,८३२
गुजरात – ९७,१९,१६३ – २१,८२,६७९
केरळ – ५९,४७,४१५ – ११,५९,६५७
आरोग्य कर्मचारी – १०,९९,४१५ – ६,०९,७९०
फ्रंटलाइन कर्मचारी – १२,७४,४९२ – ४,५८,५८६
४५ वर्षांवरील – १,०६,७१,०९३ – १२,२४,४५६
एकूण – १,५३,३७,८३२
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-ranks-seventh-and-kolhapurs-first-rank-in-the-state-in-corona-vaccination/articleshow/82363069.cms