मुंबई बातम्या

लोकल प्रवासावरील वेळमर्यादेवर व्यावसायिकांनी शोधला ‘हा’ उपाय – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारने लोकलच्या वेळा सर्वसामान्यांसाठी दुपारी ठेवल्याने लाखो चाकरमान्यांची गैरसोय कायम आहे. पण या स्थितीतही काहींनी त्यावर मार्ग काढला आहे. अनेक दुकानदार, कार्यालयांनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांसाठी वेळ बदलून घेत वेगळा आदर्श घालून दिला आहे.

मुंबईत कापड, सराफा, ऑटोमोबाइल यांसारख्या उद्योगांची तसेच किरकोळ क्षेत्रातील बाजारपेठ सर्वांत मोठी आहे. मुंबई उपनगरासह अन्य भागांतून दररोज लोकलने ये-जा करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ६० टक्के कर्मचारी याच क्षेत्रात काम करतात. पण ही सर्व क्षेत्रे अत्यावश्यक श्रेणीत येत नसल्याने त्यातील सुमारे २५ लाख कर्मचारी अद्यापही प्रतिबंधित वेळेत प्रवासापासून मुकत आहेत. त्यामुळे आता अनेक क्षेत्रातील दुकानदारांनीच स्वत:ला बदलून घेतले आहे.

वाचा: वाचनवेड्या रेल्वे प्रवाशांच्या मनाला चुटपूट लावणारी बातमी

मुंबई किरकोळ कापड व्यावसायिक महासंघाचे सचिव शैलेंद्र तिवारी यांनी सांगितले, ‘आधी आमची दुकाने सकाळी १० वाजता उघडून ११दरम्यान कामकाज सुरू करीत होतो. कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आता आम्ही ११ किंवा साडेअकरानंतर दुकान उघडतो. साफसफाई, पूजा करून प्रत्यक्ष व्यवहार दीड-दोननंतर सुरू करतो. तोपर्यंत दूरवरचे कर्मचारी दुपारी १२नंतरच्या लोकलद्वारे पोहोचू शकतात.’

वाचा: एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का

सराफा क्षेत्रातील दुकान मालकांनीही असेच केले आहे. देशातील एकूण सोने-चांदी व्यवहारांपैकी ६० टक्के व्यवहार मुंबईत होतात. यामुळे येथील सराफा क्षेत्रातही ८ लाख कर्मचारी कार्यरत असून, लोकलअभावी त्यांच्यावर रोजगार गमावण्याची भीती आहे. याबाबत सराफा व्यावसायिक मदन कोठारी यांनी सांगितले, ‘मुळात सर्वच दुकानदारांना ५० टक्के कर्मचारी कपात करावी लागली. खूप दूरच्या कर्मचाऱ्यांना आम्ही कामावर बोलवतच नाही. पण निवडक कर्मचाऱ्यांसाठी आता आम्ही दुपारी १ वाजता प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करीत आहेत. सकाळी १० ते १ ऑनलाइन पद्धतीने व्यवसाय करतो. बदललेल्या परिस्थितीच्या साच्यात स्वत: बसविण्यासाठी आम्हीदेखील बदललो आहोत.’

काम लवकर संपवण्याचा प्रयत्न

मुंबईत अगदी पाच कर्मचारीसंख्या असलेली छोटी कार्यालयेदेखील आहेत. अशा काही कार्यालयांनीही या बदलाला आपलेसे करीत वेळेत बदल केला आहे. ‘१ फेब्रुवारीपासून दुपारी १२ ते ४ लोकलमुभा मिळाल्याने आम्ही कार्यालय सुरू केले. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांना आम्ही आता दुपारी १२नंतर बोलवतो. लवकरात लवकर काम संपवून सायंकाळी ४पूर्वी परत जावे, असे आम्ही कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. पण राज्य सरकारने सर्वांसाठी लवकरात लवकर लोकल सुरु करावी’, असे आवाहन जनसंपर्क कंपनीचे संचालक विवेक नायर यांनी केले.

‘मटा’ला कळवा

नवीन लोकल वेळेनुसार आपल्या कार्यालयाने किंवा आपल्या माहितीतील एखादी कंपनी किंवा आस्थापनानेही कर्मचाऱ्यांसाठी कामाची वेळ ठरवली असेल तर ‘महाराष्ट्र टाइम्स’ला कळवा. आपली माहिती [email protected] यावर मेल करा.

वाचा: मुंबई विमानतळ खरेदीची प्रक्रिया सुरू; पहिला हिस्सा ‘अदानी’च्या ताब्यात

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/most-of-shopkeepers-and-offices-change-the-working-time-for-workers-due-to-mumbai-local-train-time-restrictions/articleshow/80779045.cms