मुंबई बातम्या

Mumbai Mankhurd Fire | तब्बल आठ तासानंतर मानखुर्दमधील आग आटोक्यात – TV9 Marathi

मानखुर्दमध्ये भीषण आग लागली आहे (fire broke out at chemical company in mankhurd).

मुंबई : तब्बल आठ तासानंतर मानखुर्दमधील केमिकल कंपनीच्या गोदामाला लागलेली आग आटोक्यात आणण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे. काही वेळात आगीवर पूर्ण नियंत्रण मिळेल असा दावा अग्नीशमन दलाने केला आहे. आगीचे वृत्त समजताच मुंबई, नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 30 गाड्या, 50 हून अधिक पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझवण्याचे काम करीत असताना केमिकल अंगावर उडाल्याने एक अग्नीशमन दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला आहे.

मंडाळा परिसरातील एका केमिकल कंपनीच्या गोदामाला दुपारी 2 च्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीचे स्वरुप एवढे तीव्र होते की एका स्क्रॅप (भंगार) गोदामालाही आगीने आपले भक्ष केले. धुराचे मोठे लोळ हवेत पसरत होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आगीचं अत्यंत रौद्र रुप दिसत होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना तब्बल आठ तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अद्याप या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. (fire broke out at chemical company in mankhurd).

जिथे आग लागली होती त्या भागाला कुर्ला स्क्रॅप म्हटलं जातं. आगीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. ही आग वाढू नये, यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. आगीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा परिसर खाली केला. या परिसरात आजूबाजूला प्लॅस्टिकचेही गोदाम आहेत. आगीचे तीव्र स्वरुप पाहता प्लॅस्टिकच्या गोदामांनाही आग लागण्याची भीती होती.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ही आग दुपारी दोन वाजता लागली. या भागात केमिकल जास्त आहे. त्यामुळे आग वाढली. गोडाऊनमध्ये केमिकल, लाकडं आहेत, अशी माहिती त्यांनी दिली (fire broke out at chemical company in mankhurd).

तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही : अबू आझमी

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “मंडाळाच्या मेन रोडच्या येथे एक स्क्रॅप आहे. याबाबत मी कलेक्टरकडेदेखील तक्रार केली आहे. 15 एकर जमीन ते अनधिकृतपणे वापरत आहेत. नकली तेल, नकली साबण बनवायचं काम तिथे होतं. दरवर्षी तिथे आग लागते. मी आठ वर्षांपासून विधानसभेत याबाबत तक्रार करत आहे. ही जागा मुंबईत आहे. आगीमुळे प्रदुषण होतं. चुकीचे काम रोखलं जावं. मी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही याबाबत तक्रार केली. त्यांनी दखल घेतली नाही. आतादेखील आग लागली. दोन दिवस येतील आणि तिसऱ्या दिवशी लोक विसरुन जातील”, असं अबू आझमी यांनी सांगितलं.

किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

याबाबत किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “मी स्वत: तिथे पोहोचत आहे. आमचे तेरा ते चौदा बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. माझ्यासोबत उपमहापौर देखील तिथे येत आहेत. आजूबाजूच्या लोकांची खूप चिंता वाटते. प्रचंड धूर आहे. गोवंडी हा परिसर खूप दाटीवाटीचा आहे. नेमकं कारण आता तिथे गेल्यावरच कळेल. आगीपासून बचाव व्हावा यासाठी नियम बनवलेले आहेत. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

[embedded content]

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/fire-broke-out-at-chemical-company-in-mankhurd-390215.html