मुंबई बातम्या

Bhai Jagtap: भाई जगताप मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष; हायकमांडने म्हणून टाकला विश्वास – Maharashtra Times

मुंबई: मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर अनुभवी नेते व विधान परिषद सदस्य भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जगताप यांच्यापुढे मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. ( Mumbai Regional Congress Committee Latest News Update )

वाचा: राहुल गांधी पुन्हा होऊ शकतात काँग्रेसचे अध्यक्ष, बैठकीत म्हणाले…

मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी अशोक उर्फ भाई जगताप यांची निवड करण्यात येत असल्याचे आज पक्षाकडून जाहीर करण्यात आले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मान्यता मिळताच मुंबई काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई पालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काँग्रेसने मराठा नेते भाई जगताप यांना मुंबईत पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मिलिंद देवरा, वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. त्यात भाई जगताप यांच्यावर हायकमांडने विश्वास टाकला आहे.

वाचा: मोदी आणि शहा एक दिवस हुकूमशहा बनतील!; शिंदे म्हणून भडकले

भाई जगताप यांच्या गाठीशी दांडगा अनुभव आहे. पक्षातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही देण्यात आली आहे. चरणजीत सिंग सप्रा यांची कार्याध्यक्षपदी, माजी मंत्री नसीम खान यांची प्रचार समिती प्रमुखपदी तर सुरेश शेट्टी यांची जाहीरनामा प्रमुखपदी वर्णी लागली आहे. मावळते अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पक्षाने त्यांचे आभार मानले आहेत व यापुढेही मुंबई काँग्रेसला आपले मार्गदर्शन लाभेल, अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे.

जगताप यांच्यापुढे अनेक आव्हाने

मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद २०१९ पासून माजी खासदार व ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्याकडे होते. मात्र त्यांच्याबद्दल पक्षातून सातत्याने नाराजी व्यक्त होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यात अनेक नावे शर्यतीत होती. मात्र, जगताप यांनी बाजी मारली आहे. जगताप यांच्यासाठी ही जबाबदारी निश्चितच सोपी नसेल. मुंबई पालिका निवडणुकीसाठी आतापासूनच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने जगताप यांना मुंबईत पक्षाची विस्कटलेली घडी सर्वप्रथम नीट करावी लागणार आहे. मुंबई काँग्रेसमध्ये सातत्याने गटबाजी पाहायला मिळाली आहे. ते पाहता सर्व गटांना सोबत घेऊन जगताप यांना पक्षबांधणी करावी लागेल. याआधी संजय निरुपम व मिलिंद देवरा यांनीही मुंबई काँग्रेसची धुरा वाहिली होती. या दोघांचाही कार्यकाळ अनेक कारणांनी चर्चेत राहिला होता. देवरा यांनीही तडकाफडकी आपली राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला होता. गायकवाड यांच्या कार्यकाळातही पक्षातील मरगळ कायम राहिली होती. आता भाई जगताप हे काँग्रेसला मुंबईत नवसंजीवनी देणार का, हे येत्या काळात कळणार आहे.

वाचा: ‘करण जोहरच्या पार्टीची तेव्हा गृहमंत्री फडणवीसांनी चौकशी का केली नाही?’

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bhai-jagtap-appointed-new-president-of-mumbai-regional-congress-committee/articleshow/79816419.cms