मुंबई बातम्या

IPL 2020: चुकीला माफी नाही, मुंबई इंडियन्सने ‘या’ गोष्टींमुळे गमावला पंजाबविरुद्धचा सामना – Maharashtra Times

अबुधाबी : मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील रविवारचा सामना चांगलाच रंगतदार झाला. पण या सामन्यात मुंबईच्या संघाकडून काही चुका झाल्या. या चुकांमुळेच मुंबईला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात मुंबईच्या नेमक्या काय चुका झाल्या, पाहा…

प्रत्येक संघ आपल्या अव्वल गोलंदाजाला १९वे किंवा अखेरचे षटक देत असतो. यावेळी मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहा चांगल्या फॉर्मात होता. पण मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने यावेळी बुमराला १८वे षटक दिले. या षटकात बुमराने लोकेश राहुलचा बळी मिळवला. पण त्यानंतर अखेरच्या दोन षटकांमध्ये मुंबईला चांगली गोलंदाजी करता आली नाही. कारण ट्रेंट बोल्टने पहिल्या स्पेलमध्ये तीन षटके टाकली होती. बराच काळ त्याने गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे त्याला महत्वाचे षटक देण्याचा निर्णय मुंबईला महागात पडला. त्याचबरोबर नॅथन कल्टर-नाइललाही यावेळी चांगली गोलंदाजी करता आली नाही.



पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईच्या बुमराने भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच पंजाबला एक विकेट गमावून फक्त पाच धावा करता आल्या होत्या. एका षटकात मुंबईपुढे सहा धावांचे असलेले आव्हान मोठे नव्हते. पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यावेळी सुपर ओव्हरमधील षटक टाकत होता. शमीच्या एका यॉर्करचा सामना रोहित शर्माला चांगल्यापद्धतीने करता आला नाही. त्यामुळे मुंबईला या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर मुंबईला दोन धावांची गरज होती. त्यावेळी पहिलीच धाव घेतना मुंबईच्या क्विंटन डीकॉकने तत्परता दाखवली नाही. डीकॉकने पहिली धाव थोडी संथ घेतली. त्यामुळे त्याला दुसरी धाव पूर्ण करता आला नाही आणि तो धावचीत झाला. त्यामुळेच सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला.

रोहित शर्मा

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये किरॉन पोलार्डने चांगली फलंदाजी केली. पण दुसरीकडे हार्दिक पंड्याची देहबोली चांगली दिसली नाही. दोन धाव घेत असताना पहिली धाव घेताना हार्दिक थोडासा संथ झाला. त्यामुळे दुसरी धाव घेताना तो धावचीत झाला. त्यानंतर मुंबईने पंजाबपुढे १२ धावांचे आव्हान ठेवले होते. या दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मुंबईने जुनीच चूक केली. त्यांनी पुन्हा एकदा बोल्टच्या हाती चेंडू दिला. बोल्टचा पहिलाच चेंडू फुलटॉस पडला. त्याचा फायदा पंजाबच्या ख्रिस गेलने चांगलाच उचलला. पहिल्याच चेंडूवर गेलने षटकार लगावला आणि सामन्याचे पारडे आपल्या बाजूला झुकवले. त्यानंतर मयांक अगरवालने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार लगावले आणि पंजाबने मुंबईवर एकही विकेट न गमावता विजय मिळवला.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2020-mumbai-indians-made-serval-mistakes-and-lost-match-against-kings-eleven-punjab-in-2nd-super-over/articleshow/78738783.cms