मुंबई : अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांपेक्षा वेगळा नसेल. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण प्रोफेशनल पद्धतीने करण्यात आला आहे, असा दावा मुंबईचे पोलील आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. ते ‘महाराष्ट्राची शान’ या ‘झी २४ तास’च्या विशेष कार्यक्रमात बोलत होते. (व्हिडिओसाठी स्क्रोल करा)
कोरोना संकटात जीवावर उदार होऊन लोकांचं रक्षण करणाऱ्या कोरोना योद्धा पोलिसांचा विशेष सन्मान ‘झी २४ तास’च्यावतीने करण्यात आला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल आणि मुंबई आयुक्त परमबीर सिंग उपस्थितीत होते.
‘दीड महिना झाला, सीबीआय काय करतेय?’
दरम्यान, यावेळी दीड महिन्यांपासून सीबीआय सुशांतसिंह यांच्या मृत्यूचा तपास करत आहे. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली. याचे उत्तर सीबीआय कधी देणार आहे, असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला आहे. त्याचवेळी याप्रकरणी लोकांना सत्य काय ते समजले पाहिजे, अशी तिखट शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.
सुशांतसिह प्रकरणावरुन त्यांनी सीबीआयवर जोरदार निशाणा साधला. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत असतानाच अचानक हा तपास काढून सीबीआयकडे देण्यात आला. दीड महिन्यापासून सीबीआय या प्रकरणात काम करत आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर आले पाहिजे, असे देशमुख यांनी सांगत टोला मारला.
मुंबई पोलीस सुशांतसिंह प्रकरणाचा योग्य दिशेने करत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. बिहार सरकारने चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. सीबीआयकडे तपास देऊनही दीड महिना लोटला आहे. ड्रग्ज कनेक्शनपलिकडे सीबीआयला काहीही हाती लागलेले नाही.
Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/sushant-singh-rajput-case-mumbai-police-investigation-in-a-completely-professional-manner-police-commissioner-parambir-singh/536970