मुंबईसह कोकणात दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इथल्या नद्यांना पूर आला असून अनेक पुलांवरुन पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळे मंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत थोडासा बदल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहराच्या अलीकडे घोड नदीवरील कळमजे पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून ती कोलाड नाक्याच्या पुढे भिरा नाका इथून वळवण्यात आली आहे. ही वळवलेली वाहतुक माणगाव एसटी स्टँड समोर निजामपूर नाका इथून वळवण्यात आली आहे. पुढे वाहतूक पुन्हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक देखील माणगावच्या निजामपूर नाका इथून वळवण्यात आलेली आहे. पावसाची स्थिती पाहून परिस्थितीनुसार पुढील बदल करण्यात येतील, असं पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
हेही वाचा
Source: https://www.mumbailive.com/mr/transport/mumbai-goa-highway-shut-for-while-due-to-heavy-rainfall-in-konkan-53751