मुंबई बातम्या

मेट्रोमुळे वाहतूक कोंडी सुटणार का? मेट्रो ३च्या कारशेडचा प्रश्न तर सुटला, पण… – Maharashtra Times

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मेट्रो मार्गिकेचे जाळे उभारले जात आहे. मुंबई परिसरात सुमारे १४ मेट्रो मार्गिका उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. या मेट्रोच्या जाळ्याच्या उभारणीनंतर उपनगरी रेल्वेवरील ताण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यास मदत मिळणार आहे. तसेच रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होऊन ते सुसह्य होतील, असे ‘एमएमआरडीए’कडून सांगितले जात आहे. सद्यस्थितीत मुंबईत सहा मेट्रो मार्गिकांच्या उभारणीचे काम सुरू आहे. तर दोन मेट्रो मार्गिका काही महिन्यांपूर्वी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

यंदा गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर डी.एन. नगर ते दहिसर ‘मेट्रो २अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर ‘मेट्रो ७’ मार्गिकेचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. पहिल्या टप्प्यात ‘मेट्रो २अ’ मार्गिकेचा डहाणूकरवाडी ते दहिसर आणि ‘मेट्रो ७’चा आरे ते दहिसर असा २०.७३ किमीचा मार्ग सुरू झाला. त्याचबरोबरच मुंबईतील दुसरी मेट्रो मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. घाटकोपर ते वर्सोवा ही मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका जून २०१४मध्ये सुरू झाल्यानंतर दुसऱ्या मेट्रोसाठी तब्बल आठ वर्षांची प्रतीक्षा मुंबईकरांना करावी लागली. ‘मेट्रो २अ’चा डी.एन. नगर ते डहाणूकरवाडी आणि ‘मेट्रो ७चा’ अंधेरी ते आरे हा टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू होईल, असे आधी सांगितले जात होते. मात्र, आता हा मार्ग सुरू होण्यासाठी जानेवारीअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ‘मेट्रो २अ’ मार्गिकेवरून चार लाख सात हजार प्रवासी, तर ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरून पाच लाख २९ हजार प्रवासी दरदिवशी प्रवास करतील. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर वर्षाच्या आत ही प्रवासी संख्या गाठली जाईल, असा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होऊन नऊ महिने झाल्यानंतरही दरदिवशीची प्रवासी संख्या ३३ हजारांवर रोडावलेली आहे. सद्यस्थितीत पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर आरे ते दहिसर अशी मेट्रो धावत आहे. मात्र, या भागात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहनांची संख्या घटलेली दिसत नाही. ही स्थिती लिंक रोड आणि एस. व्ही. रोडवरही आहे. याउलट महामार्गावर वाहनांची संख्या वाढताना दिसत असून, दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालल्याचे चित्र आहे.

अन्य मेट्रो प्रकल्पांत अडचणींचा डोंगर

‘एमएमआरडीए’च्या आधीच्या नियोजनानुसार डी.एन. नगर ते मंडाळे ‘मेट्रो २बी’ आणि वडाळा ते कासारवडवली ‘मेट्रो ४’ ऑक्टोबर २०२२मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, या दोन्ही मेट्रोंच्या कामाला ब्रेक लागला होता. सरत्या वर्षात दोन्ही मेट्रो मार्गिकांसाठी नव्याने कंत्राटदारांची नियुक्ती होऊन कामे पुन्हा सुरू झाली. आता या मेट्रो मार्गिका २०२५ मध्ये सुरू होतील, असे ‘एमएमआरडीए’कडून सांगण्यात येत आहे. स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडच्या जागेचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. केंद्र सरकारने कांजूरची जागा या मेट्रोसाठी देण्यास नकार दिला आहे. त्यातून कारशेडअभावी ‘मेट्रो ६’ कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. दहिसर ते मिरा भाईंदर ‘मेट्रो ९’चे कारशेड राई मुर्धे गावातून पुढे उत्तन येथे हलविण्याचा निर्णय नुकताच अधिवेशनादरम्यान जाहीर करण्यात आला. त्यातून या मेट्रोचा मार्ग सुमारे चार किमीने वाढणार आहे. कारशेडची जागा नवी असल्याने ‘एमएमआरडीए’ला स्वतंत्ररित्या डीपीआर तयार करावा लागणार आहे. त्यातून ‘मेट्रो ९’ पूर्ण क्षमतेने धावण्यासाठी आता जून २०२५ ही सुधारीत तारीख ठरविण्यात आली आहे.

मेट्रो ३च्या कारशेडचा प्रश्न सुटला

मुंबईतील बहुप्रतीक्षित अशा कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न सरत्या वर्षात सुटला. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेत कामाला सुरुवात केली. प्रकल्पाचा दोषपूर्ण डीपीआर, कामांना झालेला विलंब, पुनर्वसनासाठीचा अतिरिक्त खर्च यातून या मेट्रोचा खर्च तब्बल ३७ हजार कोटी रुपयांवर गेला आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMidWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3Mvd2lsbC1tZXRyby1zb2x2ZS10cmFmZmljLWphbXMtaW4tbXVtYmFpL2FydGljbGVzaG93Lzk2NjQxOTIyLmNtc9IBeWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3Mvd2lsbC1tZXRyby1zb2x2ZS10cmFmZmljLWphbXMtaW4tbXVtYmFpL2FtcF9hcnRpY2xlc2hvdy85NjY0MTkyMi5jbXM?oc=5