मुंबई : मुंबई महापालिका दरवर्षी मुंबईतील नद्यांच्या संवर्धनासाठी हजारो कोटी खर्च करत असते. एवढंच नाही तर मुंबईतील नाद्द्यांचं संवर्धन करत असल्याचं आश्वासन देखील मुंबई महापालिका देत असते. मात्र मुंबईतील नद्यांची स्थिती पाहता मुंबई महापालिका निव्वळ मुंबईकरांची फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे.
गोरेगाव पूर्व येथील आयटी पार्क येथून वाहणाऱ्या नदीची सध्या दुरावस्था झाली असून यासाठी मुंबई महापालिका जबाबदार असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच नदीसाठी बांधण्यात आलेल्या सरंक्षण भिंतीच्या बाजूस देखील अक्षरशः कचऱ्याचा ढीग साचला आहे. मागील अनेक काळापासून यासंबंधी तक्रारी करण्यात आल्या असूनही यासंबंधी प्रशासन किंवा मुंबई महापालिकेने कोणतीच कारवाई केली नसल्याचे येथील स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.
तसेच या नदीच्या स्वच्छतेसंबंधी मी जानेवारी मध्येच म्हणजे पावसाळ्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र मुंबई महापालिकेने कोणतीच पावले उचलली नसल्याचे येथील मनसेचे कार्यकर्ते विजय बोरा यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रा शेजारी अनेक झाडे झुडपे वाढली असल्यामुळे डासांचे व सापांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचेही येथील स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.
– शेफाली ढवण
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiR2h0dHBzOi8vd3d3Lm1haGFtdGIuY29tL0VuY3ljLzIwMjIvMTEvMTAvbXVtYmFpLXJpdmVyLWJtYy1nb3JlZ2Fvbi5odG1s0gEA?oc=5