मुंबई बातम्या

मुंबई : विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेच्या पतीची हत्या – Loksatta

विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून महिलेच्या पतीला खार येथे बोलावरून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – बीड : मातोश्री पतसंस्थेकडून ठेवीदारांची फसवणूक ; संचालकांविरुद्ध गुन्हा

मृत व्यक्ती (वय ३८ वर्षे) ठाण्यातील राबोडी येथील रहिवासी आहे. त्यांचे सौदर्यप्रसाधनांचे दुकान आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीशी आरोपी अखिल सय्यद याला लग्न करायचे होते. आठ दिवसांपूर्वी मृत व्यक्तीच्या पत्नीने आरोपी सय्यद विरोधात ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानुसार आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा राग मनात धरून सय्यदने मृत व्यक्तीला खार येथील सबवे येथे बोलावले. आरोपी स्वतःसोबत शस्त्र घेऊन आलेला आरोपी तेथे पोहोचल्यानंतर त्याने मृत व्यक्तीच्या मानेवर व हातावर सपासप वार केले. त्यात तो जखमी होऊन खाली कोसळला. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला.

हेही वाचा – जालना : कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

जखमी अवस्थेत खाली कोसळलेल्या त्या व्यक्तीला तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने पाहिले. त्याने तात्काळ त्याला व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल केला. तेथे उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सय्यदविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी अटक नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Source: https://www.loksatta.com/mumbai/murder-of-the-husband-of-the-woman-who-filed-the-case-of-molestation-mumbai-print-news-amy-95-3096958/