मुंबई बातम्या

मुंबईत रस्ते होणार चकाचक; महापालिका तब्बल ३५ ई-स्वीपर यंत्रे खरेदी करणार – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे ठरवले आहे. मुंबईच्या विविध भागांतील रस्ते सफाईसाठी येत्या काही महिन्यांत तब्बल ३५ ई-स्वीपर यंत्रे खरेदी केली जाणार आहेत. तसेच ओल्या कचऱ्याची विकेंद्रीत स्वरूपात विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईत नऊ ठिकाणी दोन मेट्रिक टन क्षमतेची बायोमिथेशन यंत्रे उभारण्यात येणार आहेत. त्याबाबतची निविदा प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

मुंबईत दररोज सुमारे साडेपाच हजार ते सहा हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यासाठी पालिकेचे २८ हजार आणि सात हजार कंत्राटी, असे एकूण ३५ हजार सफाई कामगार आहेत. तर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि इतर महत्त्वाचे रस्ते, पर्यटनस्थळे, चौपाट्या या सार्वजनिक ठिकाणी ई-स्वीपर यांत्रिकी झाडूने साफसफाई केली जाते. येत्या काळात सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. रस्ते सफाईसाठी पर्यावरणपूरक ३५ ई-वाहने परिवहन विभागामार्फत घेण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे.

देवनारमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ६०० टन प्रति दिन क्षमतेच्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. प्रकल्पाची आखणी व बांधकामाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पात दररोज ४ मेगावॉट वीजनिर्मिती होईल.

मुलुंड डम्पिंगवर अस्तित्वात असलेल्या कचऱ्यावर तंत्रज्ञानाचा वापर करून विल्हेवाट लावली जाणार आहे. यातून कचऱ्याने व्यापलेली जमीन पुन्हा मोकळी करण्याच्या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे सात दशलक्ष टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या कामातून डम्पिंगची सुमारे २८ हेक्टर जमीन मोकळी होणार आहे. जुलै २०२२पर्यंत नऊ लाख ९७ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

आठ घातक कचरा प्रक्रिया प्रकल्प

डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी विविध प्रयत्न पालिकेने सुरू केले आहेत. मुंबईत दररोज सुमारे ७० टन घरगुती घातक कचरा निर्माण होतो. त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी तीन प्रकल्प कार्यान्वित केले असून आठ नवीन प्रकल्पांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

८२८ सामुदायिक स्वच्छतागृहांचे लक्ष्य

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०२१पर्यंत १२ हजार ८१९ आसनांची ५६२ स्वच्छतागृहे बांधून पूर्ण झाली आहेत. सहा हजार ६३५ आसनांच्या २६६ स्वच्छतागृहांचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच २०२२साठी १९ हजार ४५४ आसने असलेली ८२८ सामुदायिक स्वच्छतागृहे बांधण्याचे लक्ष्य आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bmc-will-buy-a-swipe-machine-to-clean-mumbai/articleshow/93579940.cms