मुंबई बातम्या

स्वबळासाठी दिल्लीवाऱ्या! मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा सेनेविरुद्ध सामना – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावरच उतरावे, यासाठी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी पक्षातील नेत्यांची दिल्लीत धावपळ सुरू झाली असून, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

स्बळाच्या मागणीसाठी जगताप यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन त्यांची मनधरणी सुरू केल्याचे समजते. विशेष म्हणजे, प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीत काँग्रेसला बसलेला फटका लक्षात घेता मुंबई महापालिकेत काँग्रेस विरुद्ध शिवसेना सामना रंगण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी असताना मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढावी, अशी मागणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र मुंबई दौऱ्यात महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला होता. मात्र सत्तांतर झाल्यानंतर आता पुन्हा मुंबई काँग्रेसने ही मागणी लावून धरली आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेत आणि नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत मुंबई काँग्रेसला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मुख्यत्वे प्रभाग पुनर्रचनेत पक्षाचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह तब्बल १५हून अधिक नगरसेवकांना धक्का बसल आहे. याबाबत अनेक लेखी तक्रारीही काँग्रेसकडून देण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने त्यांना केराची टोपली दाखविली. त्यामुळे मुंबई काँग्रेसने पुन्हा स्वबळावर लढण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यासाठी भाई जगताप यांनी नुकतीच दिल्ली गाठल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या भेटीत त्यांनी काँग्रेसच्या अनेक नेतेमंडळीची भेट घेतली असून, या सर्व प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा केल्याचे कळते. जगताप यांची ही पहिलीच भेट नसून, गेल्या दोन महिन्यांत ते दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत येत्या काळात काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता मुंबई काँग्रेसमधील सूत्रांनी वर्तवली आहे. काँग्रेसकडून शिवसेनेविरोधात पुन्हा बंड पुकारले जाणार असून, यासंदर्भात लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रभाग पुनर्रचना, आरक्षणाबाबत नाराजी

महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेत आणि आरक्षण सोडतीदरम्यान काँग्रेसच्या सूचना आणि हरकतींकडे सपशेल काणाडोळा केला असल्याने काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक आणि नेते मंडळींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली होती. मात्र याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने याचे पडसाद मुंबई महागरपालिकेत उमटण्याची शक्यता आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/congress-to-go-solo-in-bmc-polls-mumbai-unit-chief-bhai-jagtap-meet-sonia-gandh/articleshow/93285141.cms