गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील जलसाठा ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजघडीला तलावांमध्ये एकूण नऊ लाख ५२ हजार दशलक्ष लिटरवर वापरायुक्त पाणी उपलब्ध झाले असून पाणी तुटवड्याची चिंता मिटली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा साठा सर्वात जास्त म्हणजेच तिप्पट आहे.
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; ‘लोकल’चे वेळापत्रक विस्कळीतच
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणामध्ये सध्या ६५.८१ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे जलसाठा ९ टक्क्यापर्यंत खालावला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात भरघोस वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत खालावलेल्या जलसाठ्यात आठवड्याभरात चांगलीच वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तलावांमध्ये तिप्पट जलसाठा उपलब्ध झाला आहे.
पाच दिवसात जलसाठा ५० टक्के –
७ जुलै रोजी जलसाठा २५ टक्क्यांवर पोहोचताच प्रशासनाने १० टक्के पाणी कपात मागे घेतली. पाच दिवसात जलसाठा ५० टक्के झाला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा तब्बल दुप्पट झाला आहे. मोडक सागर तलाव बुधवारी भरून वाहू लागल्यानंतर आता विहार, तुळशी हे मुंबईजवळचे तलावही ओसंडून वाहण्याच्या बेतात आहेत.
धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्यास पाणी कपातीची आवश्यकता भासत नाही –
मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये तलावांतील जलसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. त्यावेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्यास पाणी कपातीची आवश्यकता भासत नाही. सध्या सातही धरणांत नऊ लाख ५२ हजार ५५० दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. पावसाळ्याचे अडीच महिने शिल्लक असून तोपर्यंत तलाव काठोकाठ भरतील अशी अपेक्षा आहे.
तीन वर्षांतील १४ जुलैपर्यंतचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) –
वर्ष – जलसाठा – टक्केवारी
२०२२ – ९,५२,५५० – ६५.८१ टक्के
२०२१ – २,५१,११९ – १७.३५ टक्के
२०२० – ३,४७,१२३ – २३.९८ टक्के
Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-water-storage-in-lakes-at-65-percent-a-significant-increase-over-three-years-mumbai-print-news-msr-87-3020508/