मुंबई बातम्या

तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी; मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द – Loksatta

धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी रद्द करण्यात आली. पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात २५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पाच दिवसात पडलेल्या पावसाने जलाशयात मोठी वाढ झाली आहे.

जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील जलसाठा खालावला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे आणि पुरेसा जलसाठा उपलब्ध झाल्याने ८ जुलैपासून पाणीपुरवठ्यातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय प्रशासनाने रद्द केला आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्यातुलनेत २७ जून २०२२ रोजी एक लाख ३१ हजार ७७० दशलक्ष लिटर म्हणजे ९.१० टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. शुक्रवारी तीन लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर म्हणजे २५.९४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.

तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/satisfactory-rainfall-in-the-lake-area-10-percent-water-cut-in-mumbai-canceled-mumbai-print-news-msr-87-3011166/