मुंबई बातम्या

मुंबई एक अनोखे जंगल – Maharashtra Times

केदार गोरे

मुंबई हे नाव घेताच डोळ्यासमोर येते ती प्रचंड गर्दी, उंच इमारती, लोकांची लगबग, रस्त्यावरील वाहनांच्या लांबचलांब रांगा आणि विस्तीर्ण पसरलेले सिमेंटचे जंगल. या महानगराचे हे मनाला अस्वस्थ करणारे रूप जरी अधिक ज्ञात असले, तरी मुंबईला अनेक निसर्गदत्त पैलू आहेत, ज्याविषयी फारशी चर्चा होत नाही. त्यातला एक महत्त्वाचा आणि आपल्या मुंबईसाठी मनाचा तुरा ठरावा, असा पैलू म्हणजे निरनिराळ्या झाडाझुडपांनी नटलेले, अनेकाविध फुलांनी बहरलेले, पक्ष्यांच्या मंजुळ गाण्यांच्या मैफलींनी सारा आसमंत आनंदी करणारे येथील खरेखुरे ‘जंगल’. मुंबईतील हे जंगल मुख्यतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुमारे १०३ चौ.कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले आहे, तर शहरीकरणाने पोखरून काढलेल्या वनश्रींचे अवशेष इतर काही भागांमध्ये छोट्यामोठ्या बेटांप्रमाणे पाहायला मिळतात. सिमेंट काँक्रीटच्या जंगलाचा विळखा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती अधिकाधिक घट्ट होऊ पाहतोय. मात्र, त्यातही हे जंगल आपले अस्तित्व टिकवून आहे. एका विस्तीर्ण पसरलेल्या महानगरीत इतके मोठे क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून राखून ठेवल्याचे मुंबई हे जगातील एकमेव उदाहरण आहे, हे मुद्दाम नमूद केले पाहिजे. मुंबई महानगर हे सात बेटांना एकत्र जोडून तयार केले गेले, हे सर्वज्ञात आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी समुद्रात, तिवर आणि खाजण जमिनींवर प्रचंड प्रमाणात भराव टाकून तेथील नैसर्गिक परिसंस्था नष्ट करून एक सलग भूभाग तयार करण्यात आला. त्यानंतर मुंबईतील या सात बेटांना माहीम खाडीच्या पलीकडील ‘षष्टी’ (साल्सेट) बेटालाही जोडले आणि मुंबईच्या उपनगरांची उभारणी झाली. या सर्व ठिकाणी लहान गावे व त्यांच्या सभोवताली टेकड्या आणि जंगले होती. समुद्रकाठच्या परिसरांमध्ये सागरी जैवविविधतेची खाणच होती, असे म्हटले तर वावगे ठरू नये. तिवरांची (मॅन्ग्रोव्ह) गर्द वनराई मुख्यतः षष्टी बेटावर पाहावयास मिळे. परंतु, मुंबईची भौगोलिक रचना धोरणात्मक दृष्ट्या अतिमहत्त्वाची ठरली आणि अवघ्या काही दशकांत मुंबईचे महानगरांत रूपांतर झाले. वाढत्या शहरीकरणाने येथील झाडे, पाणथळ जागा, टेकड्या, जंगले, खाजण जमिनी नाहीशा झाल्या. कालांतराने, षष्टी बेटावरही उपनगरांच्या रूपांत मुंबईच्या शहरीकरणाने आपली पाळंमुळं पसरवली. तरीही आजच्या मुंबईत अनेक ठिकाणी भूतकाळातील हे नैसर्गिक वैभव दिसून येते ते रस्त्यालगतच्या शेकडो वर्षांपूर्वीच्या झाडांच्या रूपात. कधी एखादा वड किंवा पिंपळ गृहनिर्माण संकुलांतील आवारांत तग धरून उभा असतो, तर क्वचितच जांभूळ, आंबा, करंज, काटे सावर, बहावा, पांगारासारखे स्थानिक वृक्ष रस्त्यालगत नजरेस पडतात. या वृक्षांमुळे अनेक पक्षी मुंबई परिसरात आढळतात. काही हौशी पक्षीनिरक्षकांनी विले पार्ले येथे १२० स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद केली आहे.मलबार हिल, आरे वसाहतीतील वृक्षराजी, आयआयटीपवई येथील तलावाकाठचा परिसर ही ठिकाणे आपल्याला एका छोटेखानी जंगलाचा अनुभव देऊन जातात. बाकीच्या जंगलांचे अंश मुंबईतील इतर भागांमध्ये आपल्या अस्तित्वासाठी तुमच्या-माझ्याकडे आशेने पाहताना दिसतात. मात्र, विकासाच्या आधुनिक कल्पनांसमोर हे जंगलांचे पुंजके कितीकाळ तग धरू शकतील ते पाहायचे. मुंबईच्या उत्तरेकडील भूभाग (षष्टी बेट) घनदाट जंगलांनी व्यापला होता. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, ब्रिटिशांनी सन १८६०मध्ये विहार आणि सन १८९७मध्ये तुळशी जलाशये या जंगल भागांत

बांधली. मिठी, दहिसर, ओशिवरा, पोईसर नद्यांचे उगमस्थान आणि विहार-तुळशी (कालांतराने पोवईसुद्धा) तलावांचे पाणलोट क्षेत्र असलेले हे जंगल राखण्याचा द्रष्टेपणा (किंवा तेव्हाची गरज म्हणा) ब्रिटिशांनी दाखवला. सुरुवातीला कृष्णगिरी, मग बोरिवली आणि आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून नामकरण झालेले हे जंगल खऱ्या अर्थाने या महानगराला लाभलेला नैसर्गिक खजिना आहे, असेच म्हणावे लागेल. येथील जंगल हे मिश्र पानगळीचे व निम सदाहरित प्रकारांत मोडणारे असून, सुमारे १,३०० प्रजातींच्या वनस्पती, २८० पेक्षा अधिक पक्षी, १७२ प्रकारची फुलपाखरे, ८०हून अधिक कोळ्यांचे प्रकार आणि अनेक सस्तन प्राणी हे या परिसंस्थेचे वैभव आहे. राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४५ बिबळे नैसर्गिकपणे वावरतात. जंगलातील हरणं, रानडुक्कर, माकडं हे त्यांचे मुख्य खाद्य. परंतु भटके कुत्रे खाण्यासाठी बिबळे अनेक वेळा जंगलालगतच्या परिसरांमध्ये येतात. माणसांनी निष्काळजीपणे फेकलेल्या कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढते आहे आणि एक सोपे सावज मिळते म्हणून बिबळे येथे आकर्षित होत आहेत. काही अघटित घडल्यास दोष मात्र बिबळ्यांच्या माथी फोडला जातो. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांत अजूनही सुमारे ६० चौ.कि.मी. वर तिवरांचे अनोखे जंगल टिकून आहे. खाडी किनारी असलेल्या चिखलात उगवणाऱ्या तिवरांचे अनन्यसाधारण पर्यावरणीय महत्त्व हे २००४ साली आलेल्या त्सुनामीने आणि २००५ साली मुंबईत आलेल्या पुरामुळे अधोरेखित झालेच आहे. हवामान बदलांच्या विपरीत परिणामांची तीव्रता कमी करण्याची क्षमता या परिसंस्थेमध्ये आहे हे जगभरातील शास्त्रज्ञ मान्य करतात. मुंबईतील या जंगलांमध्ये कोल्हा, रानमांजर, उदमांजर, साप, कासवं यांसारख्या प्राण्यांचा अधिवास आहे. तुतवार, प्लवर जातींचे अनेक स्थलांतरित पक्षी येथे पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त, अनेक मासे, खेकडे, कोलंबी आणि शिंपल्यांचे प्रजनन क्षेत्र येथे आहे. म्हणूनच भारतात तिवरांनाही ‘जंगल’ घोषित करून कायद्याने संरक्षण दिले आहे. तिवरांलगत झुडपी जंगलांचे काही भाग उपनगरांमध्ये पहावयास मिळतात. येथील वनस्पती पक्षी, फुलपाखरे व इतर कीटक, सरडे, पाली, चोपईसारखे सरपटणारे प्राणीआणि मुंगूस, कोल्हे या सस्तन प्राण्यांना आसरा देतात. तेव्हा मोठाले वृक्ष नसले, तरी अशा परिसंस्थांचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही आणि त्यांना पर्यावरणदृष्ट्या कमी लेखण्याची चूक आपण करता कामा नये. अजून टिकून राहिलेल्या मुंबईतील जंगलांचा उपयोग जागरुकता वाढविण्यासाठी आणि भावी पिढीत निसर्गाविषयीची संवेदनशीलता वाढविण्यासाठी व्हायला हवा. पाण्याची साठवण, प्राणवायूची निर्मिती, जमिनीची धूप रोखणे, जैवविविधतेला आश्रय देणे आणि हवामान नियमनसारखे फायदे जंगल परिसंथानकडून आपसूकच आपल्याला मिळत आहेत. त्याची कदर केल्यास मुंबईची आणि मुंबईकरांची पुढील वाटचाल नक्कीच सुखकर होईल. ‘आयपीसीसी’ने २०२२मध्ये मांडलेल्या अहवालात मुंबईसाठी काही अतिचिंताजनक भाकिते केली आहेत. जगातील प्रमुख २०किनारपट्टीवरील शहरांवर होणाऱ्या हवामान बदल व समुद्र पातळी वाढीचे दुष्परिणामांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असेल. विकासाची व्याख्या फक्त सिमेंट काँक्रिटचे मनोरे उभारण्यापुरती मर्यादित न ठेवता, आपला दृष्टिकोन शाश्वत विकासाच्या चौकटीत ठेऊन मुंबईला अधिक सक्षम कसे करता येईल, याकडे लक्ष देण्याची अधिक गरज आहे. यापुढे कुठेही भर घालून मुंबईला वाढविता येईल, असा विचारही कोणी करू नये. मग ते गृहनिर्माण संकुल असो अथवा कोस्टल रोड प्रकल्प. स्थानिक परिसंस्थांचा झाला तेवढा नाश पुरे झाला. आता मुंबईचा आणि पर्यायाने आपला बचाव वातावरण बदलांच्या दुष्परिणामांपासून करण्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)

Source: https://maharashtratimes.com/editorial/article/a-forest-in-the-middle-of-mumbai-city/articleshow/90112875.cms