Mahesh Landge : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने गुरुवारी ठिकठिकाणी आंदोलने केली. यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये देखील भाजपने आंदोलन केले. यावेळी नवाब मलिक यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार महेश लांडगे यांची जीभ घसरली. देशद्रोही मलिकला अटक नाही, तर भरचौकात फाशी दिली पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य लांडगे यांनी केले आहे. मलिक यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा लगावला.
Beed: बीड जिल्ह्यात कत्तलखान्यांवर महिनाभरात चार कारवाया, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड: कत्तल करण्यास बंदी असलेल्या गोवंशीय जनावराच्या कत्तलखान्यावरती कारवाई करण्याच्या घटना बीडमध्ये वाढताना पाहायला मिळत आहेत. एका महिन्यामध्ये चार मोठ्या कारवाया बीड जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत. ज्यामध्ये 32 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरुन हस्तगत केला आहे. तर जिल्ह्यातील 118 जनावरांच्या कत्तलखान्यातून पोलिसांनी सुटका केली आहे.
Udayanraje: ‘मावळ्यांची शाळा’ जागवणार मराठ्यांचा धगधगता इतिहास; उदयनराजेंच्या प्रेरणेतून राबवली जाणार संकल्पना
सातारा: लहान मुलांना भावी आयुष्यात वाटचाल करत असताना त्यांना इतिहासाचा विसर होऊनये म्हणून मावळ्यांच्या शाळेच्या माध्यमातून जागृती केली पाहिजे असं खासदार उदयनराजे म्हणाले. उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त ते नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यावर आता उत्तर मिळालं असून त्यांच्या प्रेरणेतून “मावळ्यांची शाळा” अशी एक संकल्पना राबवली जाणार आहे.
काय आहे मावळ्यांची शाळा?
छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांच्याबरोबर लढलेले मावळे यांची माहिती पाठ्यपुस्तकात खूप कमी प्रमाणात असल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर त्यांचा इतिहास फक्त चौथी आणि सातवीच्या पुस्तकातच शिकवला जातो. त्यामुळे हा इतिहास सर्व विद्यार्थांपर्यंत यावा आणि तो त्यांच्या स्मरणात दीर्घकाल राहावा या उद्देशातून ‘मावळ्यांची शाळा’ म्हणून ही कल्पना उभी केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मावळ्याची माहिती व्हिडीओ कॅसेट तयार करून प्रत्येक शाळेत त्याचे वाटप केले जाणार आहे. प्रत्येक शाळा आणि शिक्षकांनी ही मावळ्यांची माहिती व्हिडीओद्वारे वर्गातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी दाखवावी. जेणेकरून छत्रपती शिवराय आणि शिवरायांच्या काळातील मावळे यांचा इतिहास हा त्याच्यासमोर कायम स्मरणात राहावा हा या कार्यक्रमाच्या मागचा एक उद्देश आहे.
Source: https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-25-february-2022-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1036094