मुंबई बातम्या

आदित्य ठाकरे आणि अजित पवारांकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी – Maharashtra Times

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी सकाळी अचानक मुंबईतील काही भागांचा धावता दौरा केला. अजित पवार (Ajit Pawar) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पहाटेच घरातून बाहेर पडले. या दोन्ही नेत्यांनी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी आणि धोबी तलाव परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी अजित पवार आणि आदित्य ठाकरे अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना दिसत होते. विशेष म्हणजे यावेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. तर अजित पवार त्यांच्या बाजूला बसले होते. अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या या एकत्रित दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार, अशी अटकळ बांधली जाऊ लागली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी यावेळी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. उमेदवार निवडीपासून अगदी प्रचाराच्या रणनीतीपर्यंत सर्वकाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे. मात्र, भाजपचे कडवे आव्हान पाहता ही निवडणूक आदित्य ठाकरे यांच्यासाठी निश्चितच सोपी नसेल. त्यामुळेच आदित्य ठाकरे आतापासूनच कंबर कसून कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे सातत्याने मुंबईत फिरत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सध्या मुंबईत शिवसेनेकडून विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा धडाका सुरु आहे. याशिवाय, राज्य सरकारच्या निर्णयप्रक्रियेतही आदित्य ठाकरे सहभाग घेताना दिसतात. शरद पवार, अजित पवार आणि महाविकासघाडीतील प्रमुख नेत्यांकडून आदित्य ठाकरे मार्गदर्शन घेताना दिसत आहेत.

‘मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना १२५ जागा जिंकेल’

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना १२५ जागा जिंकून एकहाती सत्तास्थापन करेल, असा दावा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला आहे. या निवडणुकीत शिवसेना १५० जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, आम्हाला किमान १२५ जागा मिळतील, असा विश्वास अनिल परब (Anil Parab) यांनी व्यक्त केला. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. गेल्या काही काळापासून शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड वितुष्ट निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळातील ‘ईडी’च्या कारवायांमुळे यामध्ये आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होईल, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या यांच्या एकहाती सत्ता मिळवण्याच्या दाव्यावर भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहावे लागेल.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ajit-pawar-and-aditya-thackeray-visit-diffrent-places-in-mumbai/articleshow/89492720.cms