मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी मुंबईतील करोना निर्बंध हटवण्याबाबत संकेत दिले आहेत. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत निर्बंध हटवले जाण्याची शक्यता आहे. याबाबत विचार सुरू आहे. मात्र, महत्वाची बाब म्हणजे नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या.
डिसेंबरच्या अखेरीस ओमिक्रॉन लाट आल्यानंतर पहिल्यांदाच, मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या खाली आली आहे. सोमवारी मुंबईत ३५६ रुग्णांची नोंद झाली. तर राज्यातील रुग्णसंख्या ३९ दिवसांनंतर निचांकीवर आली आहे.
दरम्यान, मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येमध्ये वेगाने घट झाली असून सोमवारी ३५६ करोनाबाधितांची नोंद झाली. या रुग्णांपैकी ३१३ रुग्णांना कोणत्याही प्रकारची करोनाची लक्षणे नसून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्याही कमी म्हणजे चाळीस इतकी नोंदवण्यात आली आहे. ऑक्सिजनची गरज मागील काही आठवड्यांपासून वाढती होती. गेल्या २४ तासांत दहा रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागली असून ९४९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
पुढील चार दिवस महत्त्वाचे
पुढील चार दिवसांत रुग्णसंख्येमध्ये कसा चढउतार होतो ते पाहणे महत्त्वाचे आहे, याकडे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आशीष मोंडे यांनी लक्ष वेधले. यापूर्वीची रुग्णसंख्या पाहिली तर सोमवारी रुग्णांची संख्या तुलनेने कमी नोंदवली जाते. त्यामुळे पुढील चार दिवस ही रुग्णसंख्येतील घट कायम राहिली तर करोनासंसर्ग नियंत्रणात आल्याचे सांगता येईल, असे त्यांनी सांगितले.
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-will-be-unlocked-by-february-end-lift-all-covid-19-restrictions-in-city-hints-bmc/articleshow/89425750.cms