मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक मोठा अपघात होता होता टळला. एअर इंडिया विमानाच्या पुश बॅक ट्रॉलीला दुपारी अचानक आग लागली. हे विमान मुंबईहून जामनगरला जाणार होते. यावेळी विमानात ८५ प्रवासी होते. या आगीमुळे विमान आणि प्रवाशांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. विमानतळावर उपस्थित असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
काय आहे पुश बॅक ट्रॉली?
पुश बॅक ट्रॉली हा मुळात एक ट्रॅक्टर आहे. या ट्रॉलीला आणि विमानाच्या पुढच्या चाकाला एक रॉड जोडलेला असतो. याच्या सहाय्याने विमानाला धावपट्टीवर आणले जाते. त्यानंतर ट्रॉली काढली जाते आणि विमान टेक ऑफसाठी तयार केले जाते.
Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/1/10/Push-back-trolley-of-an-Air-India-plane-caught-fire-.html