मुंबई बातम्या

मुंबई: अवकाळी थंडी-पावसाने रुग्ण गारठले, अनेकांनी घेतला पुलाचा आसरा – Maharashtra Times

मुंबई : विविध आजारांवर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण मुंबईत येत असतात. अनेकदा रुग्णालयात रुग्णांच्या गर्दीमुळे तत्काळ प्रवेश मिळत नाही. मुंबईत नातेवाईत-परिचित कोणीही नसलेले अनेक जण अशा वेळी पदपथांवर, धर्मशाळांमध्ये आसरा घेतात. मात्र रुग्णालय परिसरात उघड्यावरच मुक्काम करणारे अनेक रुग्ण मागील दोन दिवसांत मुंबईत अवकाळी पाऊस आणि अचानक पडलेली थंडी यांमुळे गारठून गेले आहेत. आधीच आजारपण, त्यात खिशात दमडी नाही, शहर अनोळखी, त्यामुळे रात्रीपुरता आसरा घेण्याचीही सोय नाही, अशा हलाखीत पुलाखाली अनेक जण थांबले आहेत. पाऊस थांबेल, रुग्णालयात उपचार सुरू होतील, या आशेने ते आभाळाकडे हात उंचावून प्रार्थना करत आहेत.

गाडगेबाबा धर्मशाळेचे प्रशांत देशमुख यांनी सांगितले की, करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध कमी झाल्यामुळे विविध जारांवर उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढली. उपचार खोळंबलेल्या रुग्णांनी पुन्हा संपर्क साधला. नवीन रुग्णही धर्मशाळेच्या आश्रयाला आले आहे. ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. पावसामुळे रुग्णांची, नातलगांची तारांबळ उडाली. अनेक रुग्ण हातावर पोट असणारे असतात. त्यांना धर्मशाळा, सामाजिक संस्थांच्या मदतीशिवाय पर्याय नसतो. दोन दिवसांपासून थंडी-पावसाचा जोर असल्याने हे रुग्ण गांगरून गेले. त्यांना मदत म्हणून ब्लँकेट वाटप करण्यात आले.

ऊर्जा संस्थेचे भाऊसाहेब लंगडे यांनी सांगितले की, एरव्ही पदपथावरच राहणाऱ्या रुग्णांना मुंबईकरांकडून पैसे, फळे, बिस्किटांचे पुडे अशी मदत दिली जाते. पावसामुळ‌े आणि ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या स्वरूपाच्या विषाणूच्या धास्तीमुळे दोन दिवसांपासून रस्त्यावर वर्दळ कमी आहे. त्यामुळे ही मदतदेखील रुग्णांना मिळाली नाही. पावसापासून बचावासाठी यातील काहींना ज्या संस्थेमध्ये जागा होत्या, तिथे आसरा देण्यात आला. काहींनी जिथे आडोसा मिळेल तिथे आश्रय घेतला. पूर्वीच्या तुलनेत सध्या करोनामुळे रुग्णसंख्या कमी असली, तरीही पावसाचा ताप या रुग्णांना झाल्याचे त्यांनी सांगितले

आजारापेक्षा मोठी वेदना ती काय?

निसर्गातील संकटे आपल्या हातात नसतात. जे समोर येईल, त्याला तोंड द्यावे लागते. मुंबईला उपचारासाठी येताना मनाची तयारी करूनच येतो, असे पतीच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी आसामहून आलेल्या बिनीताई सांगतात. धर्मशाळेमध्ये आसरा मिळाल्यामुळे त्यांची चिंता थोडी कमी झाली. पण करोनाची धाकधूक कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/in-the-last-two-days-patients-have-fallen-ill-in-mumbai-due-to-unseasonal-rains-and-sudden-cold/articleshow/88062168.cms