मुंबई बातम्या

मुंबई लोकलची प्रवासी संख्या वाढतेय; ‘हे’ आहे कारण – Maharashtra Times

मुंबई लोकलची प्रवासी संख्या वाढतेय

– एसटी संपाचा परिणाम

– कर्मचारी कामावर परतत असल्याने गर्दी

– दिवाळीच्या सुट्ट्याही संपुष्टात

म. टा. प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या इतर भागांतून एसटी संपाचे लोण महामुंबईतही पसरले असून संपाचा मोठा परिणाम आता मुंबई लोकलवर दिसून येत आहे. एसटी वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने महामुंबईतील प्रवाशांसमोर लोकल प्रवास हाच एकमेव पर्याय उरला आहे. त्यामुळे लोकलच्या प्रवासी संख्येत दिवसागणिक वाढ होत असून लोकल मार्गांवर पुन्हा गर्दी दिसत असून कार्यालयांच्या वेळेत लोकल पुन्हा तुडुंब भरून धावताना दिसत आहेत.

वसई, विरार, कर्जत, कसारा येथून मुंबईत रोज कामाला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापैकी अनेक जण एसटीने प्रवास करतात. संपामुळे एसटी वाहतूक बंद झाल्याने या प्रवाशांना लोकलचाच आधार आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जात असली, तरी मुंबई आणि उपनगरातील वाहतुकीच्या साधनांचा विचार केला असता, एसटीचेही स्वतंत्र महत्त्व आहे. मात्र आता संपामुळे एसटी प्रवासी लोकलकडे वळला आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजेच सोमवारी अनेक कार्यालयांत बैठका आयोजित होतात. करोना नियंत्रणात आल्यानंतरदेखील अनेक कार्यालयांत केवळ सोमवारी बैठकीसाठी हजर राहण्याच्या सूचना आहेत. यामुळे सोमवारी प्रवासी संख्येत प्रचंड वाढ होते. अशातच एसटी संपामुळे एसटीचा प्रवासी रेल्वेकडे वळला असल्याची शक्यता आहे. यामुळे लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे.

दिवाळीची सुट्टी संपल्याने आता नोकरदार वर्ग पुन्हा कामावर रुजू होत आहे. मध्य रेल्वेवरील रोजची प्रवासी संख्या सरासरी २२ लाख आहे. सोमवारी ती २६ ते २८ लाखांपर्यंत जाते. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची संख्यादेखील २० ते २२ लाखांपर्यंत पोहोचली आहे.

मटा भूमिका

नियोजन आवश्यक

राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाचा परिणाम मुंबईतदेखील जाणवत आहे. मुंबई लोकल ही शहराची मुख्य वाहतूक व्यवस्था आहे. मात्र एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्याचा परिणाम लोकलवर होताना दिसत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर, लोकलमध्ये गर्दी वाढू लागल्याने त्याचे नियोजन करणे आवश्यक असून त्यासाठी रेल्वेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अनेक प्रवासी मास्क वापरण्याचा नियम धाब्यावर बसवतात. मात्र त्यांना रोखण्यासाठी कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याकडेदेखील रेल्वे प्रशासनाने आता लक्ष देणे गरजेचे आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/commuters-increase-in-mumbai-local-due-to-msrtc-strike/articleshow/87622105.cms