मुंबई बातम्या

Nitin Gadkari: मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
  • मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार
  • गडकरींच्या घोषणेमुळं चाकरमान्यांच्या आशा पल्लवीत

प्रसाद रानडे । रत्नागिरी

ऐन दिवाळीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कोकणवासीयांना खूषखबर दिली आहे.गेली तब्बल १५ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) दीड वर्षांत पूर्ण करणार, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात बोलताना केली आहे. गडकरी यांच्या या घोषणेमुळं कोकणी चाकरमान्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ‘मुंबई गोवा हा महामार्ग गोवा व महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. रस्ता बांधण्यासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यावर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राचा प्रवास सुखद होईल, असं गडकरी म्हणाले.

वाचा: ते माझी ताकद ओळखून आहेत; नवाब मलिक यांचा रोख कुणाकडे?

मुंबई-गोवा महामार्गावर १५ वर्षांपूर्वी सुरू झालेला रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते इंदापूर हा कामाचा टप्पा आजही प्रलंबित आहे. मधल्या काळात दोन वेळा ठेकेदार कंपन्या बदलण्यात आल्या. तरीही कामाला वेग मिळालेला नाही. इंदापूर ते वाकण फाटा रस्त्याची प्रचंड दुरवस्था आहे. त्याचबरोबर वाकण फाटा ते वडखळ येथील काम देखील मोठ्या प्रमाणात अपुरे आहे. वडखळ नाका ते पळस्पे येथील ९० टक्के काम झाले असले तरी १० टक्के न झालेल्या कामामुळे वाहतुकीस अनेक अडथळे येत आहेत. या पहिल्या टप्प्यातील अपुर्‍या कामासाठी २५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रामुख्याने सुकेळी खिंडीमध्ये रुंदीकरणाचे काम अडकलेले आहे. हे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचे
निर्देश ठेकेदार कंपनीला दिले आहेत, असं गडकरी म्हणाले.

वाचा: ड्रग्ज प्रकरणात बनावट कारवायांचा आरोप झालेले समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी

रत्नागिरी जिल्ह्यात येत असलेल्या खेड ते लांजा या जवळपास १३० किमीच्या मार्गाचे काम जवळपास ठप्पच आहे. या मार्गावरील ठेकेदार कंपन्या काम करत नसल्याने त्या ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये गेल्या आहेत. हा टप्पा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आता सरकार समोर आहे. महामार्गावर टोलनाके उभी झाले, पण महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. जवळपास १०० किमीवर एक टोल नाका असे टोलनाके उभे करण्यात आले आहेत. लांजा ते सावंतवाडी हा टप्पा जवळपास पूर्ण होत आला आहे. १५ टक्के काम बाकी आहे. रत्नागिरी व रायगड जिलह्यातील काम कळीचा मुद्दा ठरत आहे. गडकरी यांच्या घोषणेप्रमाणे काम दीड वर्षात पूर्ण झाल्यास कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/mumbai-goa-highway-work-will-be-completed-in-next-one-and-half-year-says-nitin-gadkari/articleshow/87522193.cms