मुंबई बातम्या

मुंबई: व्यापारी संघटनांचा राग अनावर; ठाकरे सरकारला दिला इशारा – Sakal

मुंबईत कोरोना रूग्णसंख्या कमी असूनही लॉकडाउन मात्र सुरूच

मुंबई: बिगर अत्यावश्यक दुकानांच्या विचित्र वेळांमुळे व्यापाऱ्यांनी पंचवीस टक्के दुकाने बंद ठेवली आहेत. तर विकेंडला दुकाने बंद आणि लोकांची पर्यटनस्थळांवर गर्दी अशी स्थिती आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी झाली असूनही दुकानांवरील निर्बंध न उठवल्यास येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर बहिष्कार टाकू, असा इशारा मुंबईतील दुकानदार संघटनेने दिला आहे. (We Will Boycott Mahavikas Aghadi in Upcoming Elections Warning Given by Trade Unions)

हेही वाचा: मुंबईत गर्भवती महिलांचे लसीकरण ‘या’ दिवसापासून होणार सुरू

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी पत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या गेले पाच आठवडे लक्षणीयरित्या खाली आली आहे. त्यानुसार मुंबईला पहिल्या किंवा दुसऱ्या श्रेणीत टाकले पाहिजे. तरीही मुंबईला तिसऱ्या श्रेणीत ठेवले जात आहे, त्यामुळे दुकानांवर विनाकारण निर्बंध लादले गेले आहेत. अशा स्थितीत मुंबईतील रोजची रुग्णसंख्या दोनशेच्या खाली येण्याचा अट्टाहास सोडून दुकानांवरील निर्बंध उठवावेत, असेही फेडरेशनचे म्हणणे आहे.

हेही वाचा: “आम्ही भाजप नेत्यांना ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’ म्हणणार नाही”

मुंबईला पहिल्या-दुसऱ्या श्रेणीत आणले तर बहुसंख्य दुकाने-व्यवसाय सुरु होतील व शहरवासियांना दिलासा मिळेल. अत्यावश्यक दुकाने दिवसभर सुरु असल्याने तेथे गर्दी नसते. पण बिगर अत्यावश्यक दुकाने संध्याकाळी चार वाजेपर्यंतच खुली असल्याने, संध्याकाळनंतर शॉपिंगला जायची सवय असलेले नागरीक तेथे जातच नाहीत. विकेंडला ग्राहक येऊ शकतात, पण तेव्हा बिगर अत्यावश्यक दुकाने बंदच असतात. अशा स्थितीत दुकानांचा खर्च परवडत नसल्याने अनेकांनी दुकाने बंदच ठेवली आहेत. गेले साडेतीन महिने हीच परिस्थिती असल्याने सरकारने आता मुंबई व लगतच्या शहरांमधील निर्बंध उठवावेत, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.

हेही वाचा: बैलगाडी कोसळल्यानंतर भाई जगताप यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले…

एकतर दुकानदारांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. मुंबईतील रोजची रुग्णसंख्या दोनशेच्या खाली जाण्याची सरकार वाट पहात आहे, मात्र मुंबईत देशविदेशातून रोज लाखो लोक येत असल्याने ते सहजशक्य नाही. त्यातच लसीकरणाचा दरही खूपच कमी आहे. मात्र याकारणाने मुंबईला महिनोन महिने निर्बंधात जखडून ठेऊ नये. अन्यथा उत्पन्न बुडालेले व्यापारी लौकरच तीव्र आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे उर्वरित देशाप्रमाणे मुंबई-महाराष्ट्रातील निर्बंध उठवावेत, असेही आवाहन फेडरेशनने केले आहे.

(संपादन- विराज भागवत)

Source: https://www.esakal.com/mumbai/we-will-boycott-mahavikas-aghadi-in-upcoming-elections-warning-given-by-trade-unions