मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेविरोधात पहारेकरी भाजप सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करणार! – TV9 Marathi

मुंबई महापालिकेविरोधात भाजप सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल करणार आहे, तशी माहिती भाजप नेत्यांकडून देण्यात आलीय.

चक्रीवादळामुळे मुंबईत हजारो झाडे उन्मळून पडली

मुंबई : तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहरालाही बसलाय. मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. तर चक्रीवादळाच्या तडाख्यात शहरातील विविध भागातील हजारो वृक्ष उन्मळून पडली. याबाबत आता मुंबई महापालिकेच पहारेकऱ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपनं सत्ताधाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली आहे. मुंबई महापालिकेविरोधात भाजप सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल करणार आहे, तशी माहिती भाजप नेत्यांकडून देण्यात आलीय. (BJP will file a case against BMC for tree felling during Cyclone)

चक्रीवादळामुळे मुंबई शहरात 2 हजार 364 वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. वादळानंतर 48 तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. गेल्या 3 महिन्यापासून वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समिती समोर 18 मार्च 2021 पासून आजतागायत प्रलंबित आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल भाजपनं केलाय. येत्या आठवडाभरात वृक्ष प्राधिकरणामध्ये वृक्ष छाटणीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन प्रत्यक्ष वृक्ष छाटणीस प्रारंभ केला नाही तर मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल, असा इशारा भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत दिला.

महापालिकेच्या यंत्रणेची पोलखोल

तोत्के चक्रीवादळाला सामोरं जाण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचा केवळ देखावा करण्यात आला. चक्रीवादळासारखी नैसर्गिक आपत्तीत पालिका प्रशासनाच्या मनुष्यबळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. वादळानंतर 48 तासांचा कालावधी लोटूनही रस्त्यावर पडलेल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या बाजूला करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मोठी झाडे कापण्यासाठी साधनसामुग्री, विद्युत करवती उपलब्धच नाहीत. इतकंच नाही तर रस्त्यावरिल पालापाचोळा उचलण्यासाठी यंत्रणाच तोकडी पडल्याचे चित्र आहे, अशी टीका शिंदे यांनी केलीय.

योग्य वेळी छाटणी झाली असती तर अनेक झाडं वाचली असती

वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता तर मार्च-एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने कितीतरी झाडे कोसळलीच नसती. वृक्ष प्राधिकरण समितीच्या या अक्षम्य विलंबामुळे मुंबई शहर हजारो मोठ्या आणि प्राचीन वृक्षांना मुकलं आहे. तसंच मोठ्या प्रमाणात वित्तहानी, गाड्यांची नासधूस झाली आहे. पालिकेच्या या बेजबाबदार वर्तनाचा तीव्र निषेध भाजपच्या सदस्यांनी स्थायी समितीत केलाय.

संबंधित बातम्या :

Photo : INS कोची जहाजाला ‘तौक्ते’ने घेरलं, समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन, 14 मृतदेह सापडले; 184 जणांची सुटका

VIDEO | तौक्ते चक्रीवादळाचा कहर, मुंबईत झाड कोसळताना महिला धावली आणि…

BJP will file a case against BMC for tree felling during Cyclone

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/tauktae-cyclone-in-mumbai-bjp-will-file-a-case-against-mumbai-municipal-corporation-for-tree-felling-during-cyclone-459742.html