मुंबई बातम्या

काँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले – Lokmat

ठळक मुद्दे“काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसचा पाया आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला आहे”

मुंबई: आगामी 2022 ची मुंबई महापालिका निवडणूक पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा नारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काल रात्री कांदिवली पश्चिम रघुलीला मॉल येथे झालेल्या उत्तर मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. आगामी पालिका निवडणुकीला सुमारे एक वर्षाचा कलावधी असताना त्यांनी उत्तर मुंबईतून पालिका निवडणुकीचा बिगुल वाजवत रणशिंग फुंकले.

मनपा निवडणुकीत मुंबईतील सर्वच्या सर्व २२७ जागा लढविण्याची सगळ्याचीच इच्छा असून त्यासाठी मी प्रत्येक वॉर्डात पदयात्रा काढणार आहे. माझी मुंबई माझी काँग्रेस अंतर्गत १०० दिवस १०० वॉर्ड हा उपक्रम राबवणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे, माजी खासदार संजय निरुपम यांना या मेळाव्याला खास निमंत्रित केले होते. आत्ता मुंबई काँग्रेसमध्ये कोणतेच गट तट नाहीत आत्ता फक्त मुंबई काँग्रेस हाच एक मोठा गट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अजंता यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे  व उत्तर मुंबईतील काँग्रेसचे सर्व आजी-माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, उत्तर मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा म्हणाले की, काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसचा पाया आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला आहे आणि आजच्या या काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याने सर्व पक्षांना चेतावणी देत काँग्रेस पक्ष ही मुंबई महापालिका निवडणूक २२७ जागांवर लढविण्यास सज्ज आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, काँग्रेस पक्षाने व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकरांच्या हितासाठी नेहमीच कोविड काळामध्ये जनतेसाठी सर्वात जास्त काम काँग्रेसने केले. गरीब व मजुरांसाठी सर्वात जास्त मोफत ट्रेन काँग्रेस पक्षाने सोडल्या. आता या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचे हेच काम जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहन त्यांनी केले.

आज काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे. पण काही वेळेस काँग्रेस पक्षाला दुर्लक्षित करण्याचे कारस्थान सुरू आहे. ज्या ज्या वेळेस, ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसने इतर पक्षांसोबत युती केली आहे. त्या त्या वेळेस काँग्रेस पक्षाला दुर्लक्षित करण्यात आलेले आहे. म्हणून सत्तेत जरी असलो तरी आपली स्वतंत्र ओळख काँग्रेसने ठेवायलाच हवी. मुंबईकरांच्या हितासाठी शिवसेना असो किंवा भाजपा त्यांना विरोध करायलाच पाहिजे, असे आवाहन माजी खासदार संजय निरुपम यांनी केले.
 

Web Title: Congress’s slogan to contest Mumbai Municipal Corporation elections on its own, trumpets were blown from North Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://m.lokmat.com/politics/congresss-slogan-contest-mumbai-municipal-corporation-elections-its-own-trumpets-were-blown-north-a309/