मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेस वाद शिगेला! कशी होणार महाआघाडी? – TV9 Marathi

महापालिकेतील चिटणीस विभागाला हाताशी धरुन पालिकेत काँग्रेसला अडचणीत आणले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

मुंबई: मुंबई महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचला आहे. त्यात आता महापालिकेच्या चिटणीस विभागानं नगरसेवकांना पाठवलेल्या स्मरणपत्राची भर पडली आहे. महापालिकेच्या ऑनलाईन सभांमध्ये अनुपस्थित राहिल्यास अपात्र ठरण्याची वेळ येऊ शकते, असं स्मरणपत्र पाठवण्यात आल्यानं दोन्ही पक्षात पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (Congress disputes against Shiv Sena in Mumbai Municipal Corporation)

काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न?

मुंबई महापालिकेच्या चिटणीस विभागानं विविध पक्षातील सात नगरसेवकांना पत्र पाठवलं आहे. त्यावरुन पालिकेतील चिटणीस विभागाला हाताशी धरुन पालिकेत काँग्रेसला अडचणीत आणले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. काँग्रेस नगरसेविका कमरजहाँ सिद्दिकी यांनी वैयक्तिक कामासाठी 21 नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान रजा घेतली होती. महापालिकेच्या 27 ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेस सिद्दिकी हजर होत्या. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर सभांना त्या हजर नव्हत्या. त्यामुळे 5 जानेवारीला पार पडलेल्या सभेला अनुपस्थित राहिल्यास अपात्र ठराल, असं पत्र चिटणीस विङागानं सिद्दिकी यांना पाठवलं होतं. शिवसेना असे प्रकार मुद्दामहून करत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

काँग्रेसचा विरोधासाठी विरोध- शिवसेना

काँग्रेसचा हा आरोप म्हणजे फक्त विरोधासाठी विरोध असल्याचं प्रत्युत्तर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिलं आहे. अशी स्मरणपत्र शिवसेनेसह अन्य पक्षातील नगरसेवकांनाही पाठवली गेली आहेत. पालिकेत काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला बांधला जात असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेनेचे 2, काँग्रेसचे 2 तर भाजपच्या 3 नगरसेवकांना स्मरणपत्र दिले आहेत. यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही जाधव यांनी म्हटलंय.

मुंबई काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि विविध समित्यांच्या नियुक्तीनंतर सर्वांना आपल्या जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय. तसंच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी 100 दिवसांची योजना तयार करुन सर्वांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर एच. के. पाटील यांनी संपूर्ण कमान हाती घेतली आहे.

कुणाकडे कुठली जबाबदारी?

भाई जगताप –

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडे सदस्य नोंदणी अभियान राबवणे, मुंबई काँग्रेसचे सर्व फ्रंट, विभाग, सेलचं पुढील 45 दिवसांत पुनर्गठन करणं, सार्वजनिक सभा करण्यापासून 100 दिवसांत 100 किलोमीटरपर्यंत पदयात्रा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नसीम खान –

निवडणूक अभियान समितीचे प्रमुख नसीम खान यांच्याकडे 15 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रचार उपसमितीची निर्मिती, त्यातील सदस्यांची निवड करण्यापासून अजेंडा ठरवण्याचं काम देण्यात आलं आहे.

अमरजीत सिंह मनहास –

ई काँग्रेस समन्वय समितीचे प्रमुख अमरजीत सिंह मनहास यांच्याकडे मुंबई काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस, राज्य सरकारमधील मंत्री आणि मुंबई महापालिकेत समन्वय राखण्याची जबाबादारी दिली आहे.

सुरेश शेट्टी –

निवडणूक घोषणा पत्र आणि प्रचार समिती प्रमुख सुरेश शेट्टी यांच्याकडे काँग्रेसचं काम लोकांपर्यंत पोहोचवणं, भाजपच्या उणिवा शोधणं, राज्य सरकारनं राबवलेल्या जनहिताच्या योजना समोर आणणं, मुंबईच्या विकासातील मुंबई काँग्रेसचं योगदान, मुंबई काँग्रेसचा प्रचार अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

सर्व पदाधिकारी –

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागांमध्ये उपसमितीचा दौरा करण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच सर्व 227 वॉर्डात पक्षाला मजबूत करण्यासाठी ताळमेळ राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी! भाई जगतापांच्या हाती कोणती सूत्रं?

मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात, भातखळकरांचा घणाघात

Congress disputes against Shiv Sena in Mumbai Municipal Corporation

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/congress-disputes-against-shiv-sena-in-mumbai-municipal-corporation-365687.html