मुंबई बातम्या

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’ – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कोणताही घातपात, नियमांचे उल्लंघन तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आउट’ हाती घेतले आहे. मुंबईच्या गल्लीबोळात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. सर्व पोलिसांसह वरिष्ठ अधिकारीही रस्त्यारस्त्यांवर ‘ऑन ड्युटी’ असतील. मुंबईतील गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी गेल्या १५ दिवसांत तिसऱ्यांदा मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आउट’ हाती घेतले आहे.

दरवर्षी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले जाते. हॉटेल्स, पब, बारमध्ये प्रचंड गर्दी होते. पहाटेपर्यंत हा जल्लोष सुरू असतो. यंदा मात्र या पार्ट्यांवर अंकुश लावण्यासाठी मुंबईत रात्री ११नंतर संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या भावना ओळखून मुंबई पोलिसांनी या कालावधीत घराबाहेर पडण्याची मुभा दिली आहे आणि गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत कडक पोलिस बंदोबस्त ठेवला असून त्याची रंगीत तालीम म्हणून बुधवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल आउट’ हाती घेण्यात आले होते.

‘ऑपरेशन ऑल आउट’ म्हणजे काय?

पोलिस आयुक्त किंवा सहपोलिस आयुक्तांमार्फत आदेश येताच ठराविक कालावधीसाठी कर्तव्यावर असलेले सर्व पोलिस सज्ज होतात. सर्व विभागांचे पोलिस उपायुक्तही या मिशनमध्ये सहभागी होतात. फरारी आरोपींची माहिती जमा करणे, नाकाबंदी, गस्त, कोम्बिंग ऑपरेशन, नशा करणाऱ्यांची धरपकड यासारख्या कारवाया एकाच वेळी केल्या जातात. आपआपल्या विभागात, पोलिस ठाण्याच्या हद्दीत या कालावधीत नेमकी कोणती कारवाई केली, याची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाते.

… म्हणून महत्त्वाचे

मुंबईत डिसेंबरमध्ये ५ आणि २४ डिसेंबर असे दोन वेळा ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबवण्यात आले. यामध्ये ८१ फरार आरोपींना पकडण्यात आले. रेकॉर्डवरील, तडीपार असे सुमारे दोन हजार आरोपींची झाडाझडती घेण्यात आली. पिस्तूल, बंदुके, तलवार आदी दोन डझनहून अधिक शस्त्रे हस्तगत करण्यात आली. ड्रग्ज जप्त करतानाच नशा करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान १५ हजारांपेक्षा अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. दीड हजार लॉज, हॉटेल्स, पबची झाडाझडती घेण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘मिशन ऑल आउट’ महत्त्वाचे आहे.

करोनाचे संकट अद्यापही दूर झालेले नाही. त्यामुळे नवीन वर्षाचा जल्लोष करताना सर्वांनी भान राखणे फार गरजेचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून नवीन वर्षाचे स्वागत करूया. कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी कोणतीही कृती आपल्याकडून घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.

-विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police-conducts-all-out-operation-against-criminals-due-control-law-and-order-on-31-december/articleshow/80040059.cms